आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदक विजेत्यांवर बक्षिसांचा पाऊस

जकार्तात सुरू असलेल्या आशिया क्रीडा स्पर्धेत भारतीय खेडाळू चमकदार कामगिरी बजावत आहेत. यामध्ये महाराष्ट्राची सुवर्णकन्या राही सरनोबत हिचा देखील समावेश आहे. भारताला सुवर्ण पदक मिळवून देणाऱ्या राहीचं देशभरात कौतुक होत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनीही राहीचं अभिनंदन केलं आहे. एवढंच नव्हे, तर राहीसोबत आशियाई क्रीडा स्पर्धेत पदकांची कमाई करणाऱ्या महाराष्ट्रातील खेडाळूंना सुवर्ण पदक जिंकल्याबद्दल ५० लाखांचं बक्षीस देण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

राहीची कमाल

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी आतापर्यंत १५ पदकांची कमाई केली असून यात ४ सुवर्ण पदकांचा समावेश आहे. सुवर्ण पदक जिंकणाऱ्या या ४ खेळाडूंमध्ये कोल्हापूरच्या राहीचा समावेश आहे. राहीने २५ मीटर एअर पिस्तुल प्रकारात थायलंडच्या नफस्वॅन यांगपाइबूनला पराभूत करत सुवर्णवेध घेतला. राहीचं आशियाई स्पर्धेतील हे दुसरं पदक आहे. २०१४ मध्ये तिने याच क्रीडा प्रकारात कांस्य पदक कमावलं होतं. तर आशियाई स्पर्धेत सुवर्ण पदक कमावणारी राही पहिली भारतीय महिला नेमबाज ठरली आहे.

कुणाला किती बक्षीस?

राहीचं ही चमकदार कामगिरी लक्षात घेत राज्य सरकारनं पदक विजेत्यांसाठी बक्षीस जाहीर केली आहेत. त्यानुसार सुवर्ण पदक विजेत्यांना ५० लाखांचं, रौप्य पदक विजेत्यांना ३० लाखांचं तर कांस्य पदक विजेत्यांना २० लाखांचं बक्षीस राज्य सरकारकडून देण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांनी ट्विटद्वारे याची माहिती दिली.


हेही वाचा-

मुंबईकर रियाची महाराष्ट्राच्या फुटबाॅल संघाच्या कर्णधारपदी निवड

मुंबईत रंगणार अांतरशालेय सांघिक बुद्धिबळ चॅम्पियनशिप


पुढील बातमी
इतर बातम्या