अतिवृष्टीत रेल्वे ठप्प झाल्यास ‘बेस्ट’च्या 400 गाड्या उपलब्ध

(File Image)
(File Image)

अतिवृष्टीमुळे मुंबईत (Heavy rainfall in Mumbai) दरवर्षी रेल्वे सेवा विस्कळीत होते. मुंबईत अतिवृष्टी झाल्यास रेल्वे रुळावर पाणी साचल्याने प्रवासी ट्रेनमध्येच तासन्‌तास अडकून पडतात. यासाठीच रेल्वे वाहतूक ठप्प पडणाऱ्या 25 ठिकाणी प्रवाशांच्या सुविधेकरिता पालिका ‘बेस्ट’च्या तब्बल 400 गाड्या (Best Bus) तैनात ठेवणार आहे. शिवाय 11 एसटी बसेसही धावणार आहेत.

तसंच या ठिकाणी पिण्याचे पाणी, चहा, नाश्ता, औषधोपचाराची सुविधाही उपलब्ध ठेवण्यात येणार आहे. पालिका आयुक्त प्रशासक इकबाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनात काल झालेल्या आपत्कालीन व्यवस्थापन बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

मुंबईसह राज्याच्या अनेक भागांत पुढील काही दिवस अतिवृष्टी होणार असल्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेनेही आपली यंत्रणा सज्ज ठेवली आहे.

या नियोजनासाठी पालिकेच्या 24 विभाग स्तरावर आणि इतर संबंधित संस्थांच्या स्तगवर समन्वय अधिकारी नेमण्याचे निर्देश पालिका आयुक्तांनी यापूर्वीच दिले आहेत. यानुसार समन्वय अधिकार्‍यांची नियुक्‍तीही करण्यात आली असल्याची माहिती आपत्कालीन व्यवस्थापन विभागाद्वारे देण्यात आली.

रेल्वे बंद पडण्याच्या स्थितीत कार्यवाही सक्षमपणे करता यावी यासाठी रंगीत तालीम (मॉक ड्रिल) आयोजित करण्याचे निर्देशही यावेळी आयुक्तांनी दिले. या बैठकीला अतिरिक्‍त आयुक्‍त अश्विनी भिडे, आशीष शर्मा, पी. वेलरासू, डॉ. संजीव कुमार, आपत्कालीन व्यवस्थापन संचालक महेश नार्वेकर यांच्यासह संबंधित अधिकारी, ‘बेस्ट’, एसटी महामंडळाचे अधिकारीही उपस्थित होते.

अतिवृष्टीत रस्त्यांवर पडणारे खड्टे बुजवण्यासाठी हेल्पलाइन आणि विविध माध्यमांतून येणाऱ्या तक्रारींची तातडीने दखल घ्यावी. खड्डे विषयक तक्रारींवर 24 तासांच्या आत खड्डे भरण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश, तसेच कोणत्याही परिस्थितीत हा कालावधी 48 तासांपेक्षा अधिक असू नये यासाठी काटेकोरपणे खबरदारी घेण्याचे निर्देशही आयुक्तांनी बैठकीदरस्यान दिले.


हेही वाचा

रेल्वेचे प्रवासी आता लोकल ट्रेनचे थेट लोकेशन ट्रॅक करू शकतात

Ganpati 2022: गणेशोत्सवासाठी रोहा ते चिपळूण स्पेशल ट्रेन, जाणून घ्या सर्व माहिती

पुढील बातमी
इतर बातम्या