नव्या वर्षात रुळांवरील अपघातांवर नियंत्रण मिळवण्यासाठी गडद पिवळ्या रंगाचा वापर करण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागानं ही आधुनिक कल्पना अंमलात आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, येत्या ३ महिन्यांत मुंबई विभागातील ५० अतिधोकादायक ठिकाणी हे रंगाचे प्रयोग पूर्ण करण्यात येणार आहेत.
ठाणे, कळवा आणि मुंब्रा या स्थानकांदरम्यान ५ किलोमीटर भागात, या सर्वाधिक अपघाती मृत्यू होणाऱ्या ठिकाणी पिवळ्या रंगाचे पट्टे ओढण्यात आले होते. यामुळे या ठिकाणी अपघाती मृत्यूचे प्रमाण कमी झाल्याची माहिती समोर आली आहे. रेल्वे स्थानकांतील एकूण मृत्यूंपैकी सुमारे निम्म्याहून अधिक मृत्यू हे रूळ ओलांडताना घडतात. यामुळे रूळ ओलांडणे बंद करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून पादचारी पूल उभारणं, २ रुळांदरम्यान सुरक्षा जाळी उभारणे असे उपाय करण्यात येतात.
जानेवारी ते नोव्हेंबर २०१९ या काळात रूळ ओलांडताना ८५९ प्रवाशांचा मृत्यू झाला, तर १८४ प्रवासी जखमी झाले होते. २०१८ मध्ये प्रवासी मृत्यूचा आकडा ९४४ तर जखमींचा आकडा १५३ इतका होता. मुंबई विभागातील ५० ठिकाणी असे रंगाचे प्रयोग करण्यात येणार असल्याची माहिती मिळते.
रंगाच्या प्रयोगाबरोबर अपघातास्थळी मोटरमनला सलग हॉर्न वाजवण्यापेक्षा २-३ वेळा काही सेकंदाच्या अंतरानं हॉर्न वाजवून प्रवाशांना सावध करावं, अशा सूचना रेल्वे सुरक्षा बलाकडून रेल्वे प्रशासनाला करण्यात येणार आहेत.
हेही वाचा -
राज्यातील शाळांमध्ये बायोमेट्रिक हजेरी