गेल्यावर्षी २९ सप्टेंबरला एल्फिन्स्टन रोड स्टेशनच्या पादचारी पुलावर अफवा पसरल्याने चेंगराचेंगरी झाली आणि यात २३ जणांचा निष्पाप बळी गेला. अशा प्रकारची दुर्दैवी घटना घडू नये यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने कंबर कसली आहे.
मध्य रेल्वेच्या सर्वाधिक गर्दी होणाऱ्या १३ रेल्वे स्थानकांवरील पादचारी पुलांवर प्रवाशांच्या सुरक्षततेसाठी उपाययोजना करण्यात येणार आहे. याशिवाय अतिवृष्टीचा फटका प्रवाशांना बसू नये यासाठी हवामान खात्याच्या सहाय्याने उपाययोजना केल्या जातील, अशी माहिती मंगळवारी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा यांनी दिली.
पावसाळ्यात मध्य रेल्वेच्या स्थानकांवर प्रवाशांची गर्दी होते. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे कोणत्याही प्रकारची दुर्घटना होऊ नये, यासाठी मध्य रेल्वेच्या १३ रेल्वे स्थानकांवरील १३ पादचारी पुलांवर विशेष योजना राबवण्यात येईल. शिवाय स्थानकांवर प्रवाशांची गर्दी होऊ नये, रेल्वे स्थानकांत रेल्वे सुरक्षा दल आणि महाराष्ट्र सुरक्षा मंडळाचे जवान तैनात करण्यात येतील.
- पी.डी. पाटील मध्य रेल्वे जनसंपर्क अधिकारी
पावसाळ्यात जास्तीचा पाऊस झाल्याने रेल्वे रुळांवर पाणी तुंबतं. त्यामुळे प्रवाशांचे मोठ्याप्रमाणात हाल होतात. यंदाच्या पावसाळ्यात रेल्वे रुळांवर पाणी तुबू नये यासाठी नालेसफाई करण्याचं काम सध्या सुरू आहे.
मस्जिद बंदर, चिंचपोकळी, करी रोड, परळ, घाटकोपर, मुंलुंड, ठाणे, डोंबिवली, कल्याण, बदलापूर, टिटवाळा या स्थानकांवरील पादचारी पुलांवर सुरक्षा उपाययोजना करण्यात येणार आहे.
पावसाळ्यात प्रवाशांना हवामानाची अचूक माहिती मिळावी यासाठी मध्य रल्वेने हवामान खात्याची मदत घेऊन या १३ रेल्वे स्थानकांवर यंत्रणा बसवणार आहे. या यंत्रणेमुळे प्रवाशांना सतर्क करणे, लोकल गाड्या आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांचे नियोजन करण्यास मदत होणार आहे.
हेही वाचा -
मध्य रेल्वेकडून ७५ स्थानकांचा पुन्हा आढावा, प्रवासी सुविधांवर विशेष लक्ष
मैदानाच्या जागेवर करीरोडचा पादचारी पूल, संपादनापूर्वीच रेल्वेकडे ताबा