एल्फिन्स्टन पूल चेंगराचेंगरी दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासनाला जाग येऊन अनेक महत्त्वपूर्ण निर्णय तातडीने घेण्यात आले. त्यानुसार लवकरच मध्य रेल्वेच्या गर्दीच्या स्थानकांवरील गर्दी नियंत्रण करण्यासाठी महाराष्ट्र सुरक्षा मंडळाचे २५० सुरक्षाबल तैनात करण्यात येणार असल्याचं मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक एस.के.जैन यांनी सांगितलं आहे.
गर्दीच्या ठिकाणी अनेकदा परिस्थिती नियंत्रणापलिकडे जाते. याचा प्रत्यय २९ सप्टेंबरला एल्फिन्स्टन पूल दुर्घटनेतून दिसून आला. त्या घटनेनंतर तातडीने बैठक घेऊन मल्टी डिस्प्लिनरी टीम निवडण्यात आली. या टीमने मुंबईच्या पादचारी पुलांचं आणि रेल्वे परिसरात असणाऱ्या सुविधांचं सुरक्षा ऑडिट केलं. ऑडिट दरम्यान अनेक त्रुटी आढळल्या. आढळलेल्या त्रुटींवर रेल्वे प्रशासन तत्काळ ठोस पाऊले उचलणार असल्याचंही सांगण्यात आलं.
मध्ये रेल्वेवर येत्या काळात एकूण २१४ सरकते जिने बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. ७२ सरकत्या जिन्यांची परवानगी मिळाली आहे. त्यापैकी २२ जिने लागले आहेत आणि उर्वरीत जिने जून २०१८ पर्यंत लागणार असल्याचंही सांगण्यात आलं आहे. सर्व २१४ जिन्यांसाठी परवानगी मिळावी यासाठी रेल्वे बोर्डाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.