मुख्य धावपट्टीची दुरूस्ती सुरू, पहिल्याच दिवशी २४ विमानं रद्द

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मुख्य धावपट्टीच्या दुरुस्तीच्या कामाला सोमवारपासून सुरूवात झाली आहे. या दुरूस्तीच्या कामामुळं विमानांचं उड्डाण उशिरानं होत असल्यानं अनेक प्रवाशांना त्याचा त्रास सहन करावा लागतो आहे. परंतु, दुरूस्तीच्या पहिल्याच दिवशी प्रवाशांच्या त्रासात मोठी भर पडली. दुरूस्तीच्या कामामुळं पहिल्याच दिवशी २४ उड्डाणं रद्द झाली. तर बहुतांश विमानांना सरासरी तासाभराचा विलंब झाला.

धावपट्टीची दुरुस्ती

मुंबईच्या विमानतळाच्या घाटकोपर-विलेपार्ले असलेल्या मुख्य धावपट्टीच्या दुरुस्ती करण्यात येत आहे. ही दुरुस्ती सकाळी ९.३० ते संध्याकाळी ५.३० वाजेच्यादरम्यान करण्यात आली. मुख्य धावपट्टी बंद असल्यानं या विमानांची उड्डाणं पर्यायी धावपट्टीवर वळविण्यात आली आहेत. त्यामुळं सर्व कंपन्यांच्या मिळून २४ विमानसेवा धावपट्टीच्या दुरुस्तीचं काम पूर्ण होईपर्यंत स्थगित झाल्या आहेत.

मुंबईच्या विमानतळावरून तासाला ४५ ते ४८ तर दिवसभरात साधारण ९०० विमानांची ये-जा होते. तासाला साधरण २२ ते २४ विमानं आकाशात झेपावतात. सकाळी ९.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत जवळपास २२२ विमाने येथून रवाना होतात.

१०२ दिवस काम

धावपट्टीच्या दुरुस्तीचे हे काम २८ मार्चपर्यंत रविवारवगळता सोमवार ते शनिवार होणार आहे. याखेरीज २५ डिसेंबर, १ जानेवारी, १५ जानेवारी, १९ फेब्रुवारी, २१ फेब्रुवारी, १० मार्च व २५ मार्च या सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशीही होणार नाही. एकूण १०२ दिवस हे काम चालणार आहे.


हेही वाचा -

शिवसेनेचं संख्याबळ ६४ वर, 'या' आमदारानं दिला पाठिंबा

पैसे दिल्याशिवाय टोल नाक्यावरुन होणार प्रवास, १ डिसेंबरपासून 'हा' नियम लागू


पुढील बातमी
इतर बातम्या