मुंबई मध्य रेल्वेच्या लोकमान्य टिळक टर्मिनलवर उभ्या असलेल्या शालिमार एक्स्प्रेसमध्ये जिलेटीनच्या ५ कांड्या आढळल्यानं एकच खळबळ उडाली आहे. जिलेटीनच्या कांड्या या बुधवारी दुपारच्या सुमारास शालिमार एक्स्प्रेसची साफसफाई करताना सापडल्या आहेत. जिलेटीनच्या कांड्यांसोबत एक पत्रही पोलिसांच्या हाती लागले आहे. ‘आपण काय करु शकतो हे भाजपा सरकारला दाखवायचं आहे’, अशी धमकी या पत्रातून देण्यात आली आहे.
लोकमान्य टिळक टर्मिनल येथे जीआरपीएफ, आरपीएफचे जवान आणि बॉम्बशोधक पथक दाखल झाले आहेत. पोलिसांनी एलटीटी परिसर रिकामा केला असून या एक्स्प्रेसची तपासणी करत आहेत. मात्र, या जिलेटीनच्या कांड्या या एक्स्प्रेस आल्या कटून याबाबत अद्याप माहिती मिळालेली नसून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
या पत्रातून भाजपा सरकारला धमकी देण्यात आली आहे. 'तुम्हाला हे पार्सल फक्त दिशाभूल करण्यासाठी ठेवायचं आहे. तुम्हाला चार लोकांनी हे पार्सल दिलं असून ते ठरलेल्या तारखेला योग्य ठिकाणी ठेवायचं आहे. तुमच्यावर कोणीही शंका घेणार नाही. पार्सल ठेवल्यानंतर तुम्ही दोघे जण पुन्हा मध्य प्रदेशमध्ये निघून जा. आपण काय करु शकतो हे भाजपा सरकारला दाखवायचं आहे', अशी धमकी या पत्रातून देण्यात आली आहे.
मुंबई नेहमीच दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असते. त्यामुळं कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी पोलिसांनी महत्वाच्या ठिकाणांच्या सुरक्षेत आणखी वाढ केली आहे. त्याशिवाय, एलटीटी परिसरातील प्रवाशांना पोलिसांनी सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे.
हेही वाचा -
जुलैत बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचं भूमिपूजन
कांदिवलीमध्ये खड्ड्यात पडून ७ वर्षीय मुलाचा मृत्यू