Coronavirus Updates : आता १४ एप्रिलपर्यंत देशातील प्रवासी रेल्वेसेवा बंद

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर दुसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी कोरोना व्हायरसशी सामना करण्यासाठी घरी राहणं हाच उपाय असल्याची म्हटलं. तसंच, संपूर्ण देशात २१ दिवसांसाठी लॉकडाऊनची घोषणा केली. त्यामुळं ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्यात आलेली देशातील प्रवासी रेल्वेसेवा १४ एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेनंतर रेल्वे प्रशासनानं हा निर्णय घेतला आहे.

रेल्वे प्रशासनानं मेल, एक्स्प्रेस आणि पॅसेंजर रेल्वेसेवा १४ एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवासी वाहतूक बंद असली तरी देशातील मालगाड्या सुरू राहणार असल्याचं रेल्वे प्रशासनानं स्पष्ट केलं आहे. याआधी रेल्वे प्रशासनानं २२ मार्च ते ३१ मार्च दरम्यान मालगाड्या सोडून सर्व पॅसेंजर ट्रेन आणि मेल, एक्स्प्रेस रद्द करण्याचा निर्णय घेतला होता.

यामध्ये उपनगरीय सेवांचाही समावेश करण्यात आला होता. दरम्यान. याबाबत आयआरसीटीकडून (IRCTC) एक महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे. प्रवाशांनी आपली ऑनलाइन बुक केलेली तिकीटं रद्द करू नये, त्यांना या तिकिटांची रक्कम आपणहून देण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. देशातील रेल्वेसेवा ठप्प असली तरी आवश्यक वस्तूंचा पुरवठा सुरू राहणार असल्याचं रेल्वे प्रशासनानं म्हटलं आहे. 

२३ मार्च रोजी अन्नाधान्य, मीठ, खाद्यतेल, साखर, दूध, फळं, भाज्या, कांदे, कोळसा आणि पेट्रोलिअम उत्पादनांचे ४७४ रॅक तायर करण्यात आल्याचं समजतं. करोनाचा सामना करण्यासाठी रेल्वे बोर्डानं सरकारची साथ देण्याचा निर्णय घेतला आहे.


हेही वाचा -

संकट गंभीर; पण सरकार खंबीर - मुख्यमंत्री

तुम्हीच खरे थलायवा! ५० लाखांची मदत


पुढील बातमी
इतर बातम्या