काही दिवसांपूर्वीच बेस्ट प्रशासनानं बेस्टच्या तिकीट दरात वाढ करत मुंबईकरांना झटका दिला. हे कमी की काय म्हणून इंधनाच्या दरात विक्रमी वाढ करण्यात आल्याने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळा (एसटी) नंही भाडेवाढ करत प्रवाशांच्या खिशात हात घातला. आता मुंबईकरांसाठी याहीपेक्षा मोठा झटका बसणार आहे. मोठ्या संख्येनं मुंबईकर दैनंदिन प्रवासासाठी ज्या वाहतूक व्यवस्थेचा पर्याय स्वीकारतात त्या रिक्षा टॅक्सीच्या भाड्यातही आता वाढ होणार आहे.
रिक्षाचं भाडं किमान दोन रुपयांनी, तर टॅक्सीचं भाड किमान तीन रुपयांनी वाढवण्याची आमची मागणी होती. ही मागणी आम्ही वाहतूक विभागाकडे ठेवली होती. त्यानुसार वाहतूक विभागाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला असल्याची माहिती मुंबई टॅक्सीमन युनियनचे सरचिटणीस ए. एल. क्वाड्रोस यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली आहे. त्यामुळे आता लवकरच मुंबईकरांना रिक्षा टॅक्सीच्या भाडेवाढीचाही झटका सहन करावा लागणार आहे.
गेल्या सहा महिन्यांत सीएनजीच्या दरात दोनदा वाढ झाली आहे. त्याचा फटका रिक्षा, टॅक्सी चालकांना बसत आहे, असं म्हणत भाडेवाढीची मागणी करण्यात आली आहे. रिक्षाच्या पहिल्या दीड किमीसाठी दोन तर टॅक्सीच्या पहिल्या दीड किमीसाठी तीन रुपये भाडेवाढ करण्याची मागणी आहे. या मागणीसाठी रिक्षा, टॅक्सी चालक आक्रमक असून त्यासाठी सातत्यानं पाठपुरावा सुरू आहे. वाहतूक विभाग याबाबत सकारात्मक असल्याचं म्हटलं जातं असल्यानं, आता ही भाडेवाढ अटळ असल्याची चर्चा आहे.
हेही वाचा -
एसटी प्रवाशांवर ३० टक्के तिकीटदरवाढीचा बोजा?
रिक्षा-टॅक्सी भाडेवाढीच्या ऑनलाईन सर्वेक्षणाला अल्प प्रतिसाद