म्हणून, प्रशिक्षणार्थींवर केला लाठीचार्ज- मुख्यमंत्री

  • मुंबई लाइव्ह टीम & निलेश अहिरे
  • परिवहन

तब्बल साडेतीन ते चार तास आंदोलन केल्यानंतर रेल्वे अॅप्रेटिंसच्या प्रशिक्षाणार्थींनी माटुंगा ते दादर दरम्यान केलेला रेलरोको मागे घेतला. मात्र या आंदोलनादरम्यान रेल्वे पोलिसांनी प्रशिक्षणार्थींवर केलेल्या लाठीचार्जमुळे राज्य सरकारवर चांगलीच टीकेची झोड उठली आहे. त्यावर विधानसभेत उत्तर देताना प्रशिक्षणार्थींनी दगडफेक केल्यानेच पोलिसांना लाठीजार्च करावा लागला, असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सारवासारव केली. एवढंच नव्हे, तर या आंदोलनात अनेक विद्यार्थी जखमी असूनही मुख्यमंत्र्यांनी कुणीही जखमी नसल्याचं आपलं म्हणणं रेटून नेलं.

काय म्हणाले मुख्यमंत्री?

रेल्वेच्या प्रशिक्षणांर्थींनी सकाळी ७ वाजेपासून माटुंगा ते दादर दरम्यान रेल्वे ट्रॅकवर उतरत रेलरोको केला. यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि ठाण्याच्या दिशेला जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. शिवाय या रेलरोकोचा लांब पल्ल्यांच्या गाड्यांनाही फटका बसला. यामुळे मध्य रेल्वेचं पूर्ण वेळापत्रक कोलमडलं.

 

नाईलाजाने लाठीचार्ज

या दरम्यान प्रशिक्षणार्थींना आंदोलन मागे घेऊन ट्रॅक खाली करण्याची विनंती करण्यास गेलेल्या पोलिसांवर आंदोलनकर्त्यांनी दगडफेक सुरू केली. त्यामुळे नाईलाजाने प्रशिक्षार्थींवर लाठीचार्ज करावा लागला, असं मुख्यमंत्री म्हणाले.

या आंदोलनाविषयी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याशी चर्चा झाली. शिवाय पोलिसांच्या मध्यस्थीने रेल्वे प्रशासन आंदोलनकर्त्यांशीही चर्चा करत होते.

कुणीही जखमी नाही?

अगोदर रेल्वेतील अॅप्रेंटिस भरतीसाठी १० टक्के एवढं आरक्षण होतं. पण ते आरक्षण वाढवून २० टक्के करण्यात आलं. परंतु तरिही हे आरक्षण १०० टक्के असावं, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. दगडफेक केल्यामुळे लाठीचार्ज करावा लागला, तरी या लाठीहल्ल्यात कुणीही जखमी झालेलं नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले.


हेही वाचा-

Live : रेल्वे प्रशिक्षणार्थींनी घेतली राज ठाकरेंची भेट

अखेर प्रशिक्षणार्थींचं आंदोलन मागे, रेल्वे ट्रॅक मोकळा


पुढील बातमी
इतर बातम्या