JEE च्या विद्यार्थ्यांसाठी पश्चिम रेल्वे मार्गावर विशेष गाड्या

'जेईई'च्या विद्यार्थ्यांसाठी पश्चिम रेल्वे मार्गावर विशेष गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि रेल्वे प्रशासनाने सोमवारी रेल्वे प्रवासाची परवानगी दिली. मुंबई महागरात 'जेईई'ची परीक्षा देणारे सुमारे २७ हजार विद्यार्थी असून, 'नीट'ची परीक्षा देणारे ४० हजार विद्यार्थी आहेत. विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रावरच रेल्वेप्रवासाची परवानगी असणार आहे. विद्यार्थ्यांना रेल्वेप्रवास फक्त परीक्षांपुरताच मर्यादीत असेल, असंही रेल्वे प्रशासनानं यापूर्वी स्पष्ट केलं होतं.

१ सप्टेंबरपासून सुरू झालेल्या ‘जेईई’च्या, तर १३ सप्टेंबरला होणाऱ्या ‘नीट’ परीक्षांसाठीची विद्यार्थ्यांची प्रवासचिंता अखेर दूर झाली आहे. 'जेईई' परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी पश्चिम रेल्वे उपनगरीय मार्गावर ४६ अतिरिक्त रेल्वे गाड्या सो़डण्यात येणार आहेत. १ सप्टेंबर ते ६ सप्टेंबर या कालावधीत या गाड्या सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसंच यापूर्वी चालवण्यात येणाऱ्या ३५० ट्रेन व्यतिरिक्त या ट्रेन धावणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.

पश्चिम आणि मध्य रेल्वेवरुन सध्या साडेतीन लाखांहून अधिक अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना प्रवासाची मुभा आहे. पश्चिम आणि मध्य रेल्वे प्रत्येकी ३५० रेल्वे फेऱ्या चालवते. अन्य प्रवाशांना प्रवासाची मुभा नसल्याने कल्याण, डोंबिवली, कर्जत, कसारा, बदलापूर, अंबरनाथ, विरार येथून मुंबई शहराच्या दिशेने किंवा शहरातून उपनगराकडे प्रवास करणाऱ्यांना मोठा मनस्ताप होतो.

राज्यात ‘जेईई’साठी १ लाख १० हजार ३०० विद्यार्थी बसणार असून, मुंबई व नवी मुंबईत २० हजार २५६ आणि ठाण्यात ७ हजार १९१ विद्यार्थी आहेत. १३ सप्टेंबरला होणाऱ्या ‘नीट’च्या परीक्षेसाठी मुंबईतून २१ हजार ३९६, ठाण्यातून १० हजार ४२० आणि नवी मुंबईतून ८ हजार २७९ विद्यार्थी आहेत.


हेही वाचा -

आरटीई प्रवेशांना १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

महाराष्ट्रात राज्यांतर्गत रेल्वे प्रवासाला परवानगी


पुढील बातमी
इतर बातम्या