मध्य रेल्वेनं राज्यांतर्गंत प्रवासी वाहतूक पुन्हा सुरू करण्याची परवानगी दिली आहे. राज्यांतर्गत रेल्वे बुकिंग बुधवारी म्हणजेच २ सप्टेंबरपासून सुरू होत असल्याचं मध्य रेल्वेनं काढलेल्या परिपत्रकात नमूद करण्यात आलं आहे. आरक्षण पद्धतीनं २ सप्टेंबरपासून राज्यांतर्गत प्रवासी वाहतूक सुरू होणार असल्याचं रेल्वेनं स्पष्ट केलं आहे.
लॉकडाऊनदरम्यान परराज्यातील नागरिकांना घरी पोहोचवण्यासाठी रेल्वेनं विशेष ट्रेन चालविल्या होत्या. सध्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल गाड्या सुरू आहेत. मात्र अद्यापही सर्वसामान्य प्रवाशांसाठी लोकल सुरू करण्यात आलेली नाही. याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.
हेही वाचा : लॉकडाऊनमध्ये मध्य रेल्वे ठरतेय जीवनवाहिनी
सोमवारीच राज्य सरकारनं राज्यातील आंतरजिल्हा प्रवासासाठीची ई-पास सक्ती रद्द करत प्रवासावरील निर्बंध काढल्याची घोषणा केली. नवी मार्गदर्शक तत्त्वे बुधवार, २ सप्टेंबरपासून अमलात येतील आणि ई-पासही रद्द होईल. नव्या अधिसुचनेनुसार सरकारी आणि खासगी कार्यालयांमधील उपस्थितीचे प्रमाण वाढवण्यात आले आहे.
केंद्र सरकारनं मेट्रो रेल्वे सुरू करण्यास मुभा दिली असली तरी राज्यात आणखी महिनाभर तरी मेट्रो बंदच राहील. राज्य सरकारने सप्टेंबर महिन्यासाठी लागू केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांत ई-पास रद्द करण्याची मागणी मान्य केली आणि प्रवासाला मुभा दिली.
हेही वाचा