राज्याच्या अन्न आणि औषध विभागाने सांताक्रूझमधील पालिकेच्या व्ही. एन. देसाई रुग्णालयाच्या रक्तपेढीवर कारवाई करत परवाना निलंबित करण्याचा निर्णय घेतला होता. पण, तुर्तास तरी या रुग्णालयाच्या रक्तपेढीचा परवाना निलंबित करण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे.
रुग्णालयात कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या, रक्त वाया जाण्याचं प्रमाण, परवाने नुतनीकरण न करणं या आणि अशा विविध कारणांमुळे रक्तपेढ्यांचे परवाने रद्द करण्यात येतात. या सर्व त्रुटी व्ही. एन. देसाई रुग्णालयात आढळून आल्या होत्या. त्यामुळे राज्याच्या अन्न आणि औषध विभागाने कारवाई करण्याचा निर्णय घेतला.
अन्न आणि औषध विभागाकडून आतापर्यंत मुंबईतील अशा ५५ रक्तपेढ्यांची तपासणी करून चौकशी केली आहे. या चौकशीत चार रक्तपेढ्या दोषी आढळल्या. त्यात. व्ही. एन. देसाई रुग्णालयाच्या रक्तपेढीचा समावेश होता. त्यानुसार चार रक्तपेढ्यांचे परवाने रद्द करण्याचे आदेश देण्यात आले. पण, आता व्ही .एन. देसाई या रुग्णालयाच्या रक्तपेढीवरची कारवाई थांबवत तूर्तास या परवाना रद्द करण्याच्या प्रक्रियेला स्थगिती दिली आहे.
राज्याच्या अन्न आणि औषध विभागाने मुंबईतील तीन ब्लड बॅंकांचे परवाने निलंबित केले आहेत. या ब्लड बॅंकांना एफडीएने कारणे दाखवा नोटीस बजावली होती. यानंतर या ब्लड बॅंकांवर कारवाई करण्यात आली आहे. अन्न आणि औषध प्रशासन विभागाने दिलेल्या माहितीनुसार गोवंडीतील पल्लवी रक्तपेढी, समर्पण रक्तपेढी, संत निरंकारी रक्तपेढी या रक्तपेढ्यांचा परवाना रद्द करण्यात आला आहे.
तर व्ही. एन. देसाई रुग्णालयाच्या रक्तपेढीचा परवाना अन्न आणि औषध प्रशासनाने निलंबित केला आहे. या रक्तपेढ्यांना कारणे-दाखवा नोटीस पाठवण्यात आली होती. त्यानुसार या रक्तपेढ्यांनी आपली मतं मांडली. पण, समाधानकारक उत्तर न मिळाल्याने ही कारवाई करण्यात आली असल्याचं अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे सह आयुक्त अर्जुन खडतरे यांनी सांगितलं.