केंद्र आणि राज्य सरकारच्या फसव्या धोरणांमुळे आर्थिक, सामाजिक परिस्थिती खालावली असून सर्वच क्षेत्रात अपयशी ठरलेल्या आणि लोकशाही मूल्यांची पायमल्ली करणाऱ्या भाजप सरकार विरोधात मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यभर धरणे आणि मौनव्रत आंदोलन केलं.
भाजपच्या प्रतिगामी धोरणांमुळे महात्मा गांधींनी मिळवून दिलेलं स्वातंत्र्य, लोकशाही आणि संविधानिक सार्वभौमत्व धोक्यात आलेलं आहे. त्यामुळे सरकार विरोधात राष्ट्रवादीने आंदोलनाचं हत्यार उपसलं असल्याचं सांगत 2 ऑक्टोबरला गांधी जयंतीच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जंयत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर महात्मा गांधींच्या पुतळ्याखाली बसून धरणे आणि मौनव्रत आंदोलन करण्यात आलं.
मंत्रालयाजवळ महात्मा गांधीजींच्या पुतळयासमोर प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, विधीमंडळ पक्षनेते अजित पवार, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळ, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक, मुंबई अध्यक्ष सचिन अहिर आदी नेत्यांसह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मंगळवारी सकाळी 9 वाजल्यापासून ते दुपारी 12 वाजेपर्यंत मौनव्रत आंदोलन केलं.