BSNL आणि MTNL च्या 'इतक्या' कर्मचाऱ्यांचा स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज

सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएल (BSNL) आणि एमटीएनएल (MTNL) च्या ६० हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती (व्हीआरएस) योजनेसाठी अर्ज केला आहे. गेल्या काही वर्षांपासून आर्थिक संकटात असलेल्या बीएसएनएल आणि एमटीएनएलचं विलिनीकरण होणार आहे. विलिनीकरणाबरोबरच स्वेच्छानिवृत्तीची योजनाही जाहीर करण्यात आली आहे. याला कर्मचाऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. 

४ नोव्हेंबर ते३ डिसेंबर या काळात स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज करता येणार आहे. स्वेच्छानिवृत्ती ३१ जानेवारी २०२० पासून लागू होईल, अशी माहिती बीएसएनएलकडून देण्यात आली आहे. बीएसएनएलच्या एकूण दीड लाख कर्मचाऱ्यांपैकी १ लाख कर्मचारी व्हीआरएस घेण्यास पात्र आहेत. कंपनीला आशा आहे की यापैकी ७०  ते ८० हजार कर्मचारी व्हीआरएस घेतील. इतक्या कर्मचाऱ्यांनी व्हीआरएस घेतल्यास बीएसएनएलची ७ हजार कोटी रुपयांची बचत होणार आहे.

५० वर्षांपेक्षा जास्त वयाचे सर्व कर्मचारी या योजनेत ऐच्छिक सेवानिवृत्ती घेऊ शकतात. आतापर्यंत दोन्ही कंपन्यांच्या ६० हजार कर्मचाऱ्यांनी व्हीआरएससाठी अर्ज केला आहे. या योजनेस पात्र असणाऱ्या कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या भरपाईत सेवा पूर्ण झालेल्या प्रत्येक वर्षासाठी ३५ दिवसांचा पगार आणि सेवानिवृत्तीच्या उर्वरित प्रत्येक वर्षासाठी २५ दिवसांचा पगार जोडला जाणार आहे. एमटीएनएलची योजना व्हीआरएसच्या गुजरात मॉडेलवर आधारित आहे.


हेही वाचा -

सावधान! पॅन क्रमांक चुकीचा दिला तर द्यावा लागेल दंड

मोबाइल नंबर पोर्टेबिलिटीसाठी आता लागणार 'एवढे' दिवस


पुढील बातमी
इतर बातम्या