मार्चमध्ये सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे कर्मचारी पुन्हा संपावर जाणार आहेत. अहवालानुसार बँक संघटना ११ ते १३ मार्च असे तीन दिवस संप पुकारू शकतात. ३१ जानेवारी आणि १ फेब्रुवारीला बँक कर्मचारी दोन दिवसांच्या संपावर गेले होते. पण अद्याप कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या गेल्या नाहीत. त्यामुळे पुन्हा त्यांनी संपाचं हत्यार उचललं आहे.
१) कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा बाकी असलेला आढावा घेणं
२) बँक कर्मचाऱ्यांना आठवड्यातून दोन दिवसांची सुट्टी
३) कौटुंबिक पेंशनमध्ये सुधारणा करण्यात यावी
४) विशेष भत्ता
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा दर पाच वर्षांनी आढावा घेतला जातो. गेल्या वेळी बँक कर्मचाऱ्यांच्या पगाराचा २०१२ मध्ये आढावा घेण्यात आला होता. त्यानंतर, २०१७ मध्ये कर्मचाऱ्यांच्या पगाराचा घेण्यात येणारा आढावा अद्याप बाकी आहे. शिवाय बँक कर्मचाऱ्यांना आठवड्यातून दोन दिवसांची सुट्टी देण्यात यावी, अशी देखील संघटनांची मागणी आहे. मुलभूत वेतनासोबतच विशेष भत्ता, कौटुंबिक पेंशनमध्ये सुधारणा अशा बँक कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या आहेत.
जर ११ ते १३ मार्च रोजी बँक कर्मचारी संपावर गेले तर बँका ५ दिवस बंद राहू शकतात. कारण तीन दिवसांच्या संपानंतर १४ मार्च रोजी महिन्याचा दुसरा शनिवार आणि त्यानंतर १५ मार्च रोजी रविवार आहे. म्हणजेच संप झाला तर बँकांच्या कामकाजावर याचा परिणाम होऊ शकतो.
बँक एम्प्लॉईज ऑफ इंडिया (बीईएफआय) आणि ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन (एआयबीईए) कर्मचाऱ्यांचं नेतृत्व करीत आहेत. बँकांच्या संघटनांचं म्हणणं असं आहे की, जर त्यांच्या मागण्या मान्य न झाल्या तर ते १ एप्रिलपासून अनिश्चित काळासाठी देशव्यापी संपावर जातील. त्यामुळे ग्राहकांनी त्यांची बँकेची कामं मार्चच्या आधी पर्ण करावीत.जर संप बेमुदत झाला तर ग्राहकांची कामं अडकू शकतात.
मार्चमध्ये बँक कर्मचाऱ्यांनी संप केल्यास, यावर्षी आतापर्यंतचा हा तिसरा बँक संप होईल. यापूर्वी ८ जानेवारी रोजी भारत बंदच्या वेळी बँक संघटनांनी मोदी सरकारच्या धोरणांच्या विरोधात एक दिवसाचा संप पुकारला होता. यानंतर ३१ जानेवारी आणि १ फेब्रुवारी रोजी संप झाला होता.
हेही वाचा