महिंद्र अॅण्ड महिंद्र लिमिटेडने महाराष्ट्रातील नागपूर, चाकण, मुंबईतील कांदिवली येथील प्रकल्प बंद केले आहेत. महिंद्रने यापूर्वीच आपल्या कार्यालयांतील कर्मचाऱ्यांना घरून काम करण्यास सांगितले आहे. मारुती सुझुकी इंडियाने हरयाणातील माणेसर व गुरूग्राम येथील आपले कारखाने काही कालावधीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही प्रकल्पांतून वर्षाला १५.५ लाख वाहनांची निर्मिती केली जाते. रोहतक येथे असलेले कंपनीचे संशोधन व विकास केंद्रही बंद राहणार आहे.
दुचाकींची निर्मिती करणारी हिरो मोटोकॉर्पने ३१ मार्चपर्यंत राजस्थानातील जयपूर व नीमराणा येथे असलेले प्रकल्प तातडीने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर बांगलादेश व कोलंबिया येथील प्रकल्पही कंपनी बंद ठेवणार आहे. फियाट क्रिसलर कंपनीने रांजणगावचा प्रकल्प बंद ठेवला आहे. केवळ अत्यावश्यक सेवांसाठी असलेले कर्मचारीच प्रकल्पात प्रत्यक्ष हजर राहणार आहेत.
टाटा मोटर्सने पुणे येथे असलेला मुख्य प्रकल्प बंद केला आहे. टाटा मोटर्सचे सीईओ व व्यवस्थापकीय संचालक ग्वान्टेर बुश्चेक यांनी कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या संदेशात म्हटले आहे की, कंपनीने अनेक कर्मचारी प्रत्यक्ष कारखान्यात तसेच इंजिनीअरिंग संशोधन केंद्रात काम करतात. त्यामुळे त्यांना घरून काम करता येणे शक्य नाही. अशा कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची सर्वतोपरी काळजी घेऊन त्यांना कामावर उपस्थित राहण्याची मुभा देण्यात आली आहे.
हेही वाचा -