कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य सरकार विविध उपाययोजना करत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यूची घोषणा केली होती. या जनता कर्फ्यूला रविवारी देशातील नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. अशातच राज्य सरकारनं कोरोनाला रोखण्यासाठी ३१ मार्च पर्यंत महाराष्ट्र लॉकडाऊनची घोषणा केली. त्यानुसार आता केवळ जीवनाश्यक वस्तूंव्यतिरिक्त इतर दुकानं बंद राहाणार आहेत. त्याचप्रमाणं, मुंबईतील पेट्रोल पंप देखील दिवसातून केवळ १२ तास सुरू राहाणार आहे.
मुंबईतील पेट्रोल पंप हे सकाळी ७ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंतच सुरू राहाणार आहेत. याबाबत मुंबईचे पेट्रोल पंप डीलर असोशिएशचे माजी अध्यक्ष रवी शिंदे यांनी शनिवारी माहिती दिली. त्यामुळं वाहन चालकांना प्रवासासाठी सकाळी ७ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत पेट्रोल भरता येणार आहे. जनता कर्फ्यूच्या कालावधीत मोजकेच कर्मचारी उपलब्ध होते. पेट्रोल पंपाची वेळ कमी केल्यानं अत्यावश्यक सेवा सुरू ठेवता येते.
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यभरातील दुकानं बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. यामध्ये केवळ जीवनाश्यक वस्तूंची दुकानं सुरू राहाणार आहेत. त्याशिवाय, मुंबईची लाइफलाइन लोकलही बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ पाहता राज्याचे आरोग्यमंत्री व मुख्यमंत्री यांनी गरज असेल तरच घराबाहेर पडा अन्यथा घराबाहेर पडणं टाळा असं आवाहन केलं आहे.