शीवच्या प्रतिक्षानगरमधील प्रभाग क्रमांक १७३ चे शिवसेना नगरसेवक प्रल्हाद ठोंबरे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर होत असलेल्या पोटनिवडणुकीत शिवसेना आणि काँग्रेसमध्ये थेट लढत होत आहे. ठोंबरे यांच्या भावाला उमेदवारी नाकारत शिवसेनेने दुसऱ्या उमेदवाराला संधी दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये काहीसं नाराजीचं वातावरण पसरलं आहे. त्यातच काँग्रेसने दिलेला उमेदवारही एकेकाळचा शिवसेनेचा पदाधिकारी असल्यामुळे आणि मते खाणारे फारसे अपक्ष रिंगणात न उतरल्यामुळे शिवसेनेसमोर काँग्रेसचं कडवं आव्हान राहणार आहे.
मुंबईतील प्रतिक्षा नगरमधील प्रभाग १७३ मधील शिवसेनेचे नगरसेवक आणि एफ –उत्तर व दक्षिण प्रभाग समितीचे अध्यक्ष प्रल्हाद ठोंबरे यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं. त्यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या प्रभागात पोटनिवडणूक होत आहे. येत्या शुक्रवारी ६ एप्रिल रोजी ही पोटनिवडणूक होत आहे.
या निवडणुकीत काँग्रेसच्यावतीने सुनील शेट्ये आणि शिवसेनेच्यावतीने रामदास कांबळे हे उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात आहेत. याशिवाय गौतम झेंडे हे अपक्ष उमेदवार असून तीन उमेदवार निवडणुकीत उभे असले तरी प्रत्यक्षात शिवसेना आणि काँग्रेस उमेदवारांमध्येच ही निवडणूक असल्याचं म्हटलं जात आहे.
प्रभाग २१ मधील भाजपा नगरसेविका शैलजा गिरकर यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेने उमेदवार न देता भाजपाला पाठिंबा दिला होता. त्याची परतफेड भाजपाने प्रभाग क्रमांक १७३ मध्ये उमेदवार न देता करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भाजपाने या प्रभागात आपला उमेदवार न देता शिवसेनेला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रतिक्षा नगर आणि पंचशील नगरमधील मतदान हे प्रमुख निर्णायक असून प्रतिक्षा नगरमध्ये शिवसेनेचं प्रस्थ असले तरी पंचशील नगरमध्ये शिवसेना तसंच भाजपा विरोधी वातावरण आहे. मात्र, या निवडणुकीत शिवसेना उमेदवार १० हजार मताधिक्यांनी निवडून येईल, असा विश्वास विभागप्रमुख व नगरसेवक मंगेश सातमकर यांनी व्यक्त केला.
तर, विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी या निवडणुकीत काँग्रेस पूर्ण ताकदीनिशी उतरली असून काँग्रेससाठीही अनुकूल वातावरण आहे. त्याचा फायदा निश्चितच आम्हाला होणार आहे. नुकत्याच झालेल्या महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत सुनील शेट्ये यांनी अडीच हजार मते मिळवली होती. त्यांच्यापाठिशी जनमत असून काँग्रेससह सर्वच पक्षांचा आम्हाला पाठिंबा आहे. खुद्द ठोंबरे यांचे कुटुंबीय शिवसेनेवर नाराज आहे. यासर्वांचा लाभ काँग्रेसला निश्चितच होईल, असं स्पष्ट केलं आहे.
हेही वाचा-
युतीच्या चर्चेची जबाबदारी मुनगंटीवारांवर?
कर्नाटकात धनुष्यबाण सुटणार, शिवसेना लढवणार ५०-५५ जागा