सर्वपित्री अमावस्येला 'अशी' श्रद्धांजली का देऊ नये?

  • राजश्री पतंगे & मुंबई लाइव्ह टीम
  • संस्कृती

हयात नसलेले आपले पूर्वज म्हणजेच 'पितर' यांच्या आत्म्याला शांती लाभावी म्हणून भाद्रपद महिन्यात श्राद्ध विधी करण्याची प्रथा भारतात प्राचीन काळापासून सुरू आहे. या महिन्यात आपल्या दिवंगत पितरांच्या स्मरणार्थ अनेकजण पूजाविधी करतात. पण एकदा का श्राद्ध मासाला प्रारंभ झाला की कोणत्याही नवीन कामाला सुरुवात करणे हे अशुभ मानले जाते. याव्यतिरिक्त या दिवसांत नवीन कपडे, घर, दागिने अशी कोणतीही खरेदी करण्याचे वा लग्न किंवा महत्त्वाची बोलणी करण्याचेही अनेकजण टाळतात. पण आपलेच पूर्वज आपल्यासाठी अशुभ कसे असू शकतात? असा प्रश्नही यामुळे निर्माण होतो.    

काय आहे सर्वपित्री अमावस्या?

भाद्रपद महिन्यात येणाऱ्या अमावस्येला सर्वपित्री अमावस्या म्हणजेच पितृपक्षाचा शेवटचा दिवस असे म्हणतात. या अमावस्येला 'महालय अमावस्या' असेही म्हटले जाते. वर्षातून एकदा आपल्या दिवंगत पूर्वजांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांच्या नावाने पूजाविधी करण्यात येतेे.

खरेतर ज्या तिथीला आपल्या पितरांचे निधन झाले असेल तीच स्थिती धरून पितृ पक्षातील पंधरवड्यात त्यांच्यासाठी श्राद्ध केले जाते. पण ज्यांना पितरांच्या निधनाची तिथी माहीत नसेल, असे व्यक्ती सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी त्यांच्या पितरांसाठी श्राद्ध विधी करतात. 

भाद्रपद महिन्यातील अमावस्या ही सर्वपित्री अमावस्या म्हणून ओळखली जाते. आपल्या दिवंगत पूर्वजांच्या स्मरणार्थ हा दिवस महत्त्वाचा असून या दिवशी त्यांचे आत्मे आपल्याकडे येतात, असा समज आहे. वैज्ञानिकदृष्ट्या या दिवशी सूर्य आणि चंद्र एकाच नक्षत्रात येतात. या दिवशी सूर्य आणि चंद्र यांचे उद्यास्त एकाच वेळी होते. आपल्याकडे अमावस्येला अशूभ मानले जात असले, तरी काही अमावस्या महत्त्वाच्या असतात. उत्तरा फाल्गुनी नक्षत्राला जेव्हा सूर्य आणि चंद्राची युती होते, तेव्हा सर्वपित्री अमावस्या सुरू होते. उत्तरा फाल्गुनी नक्षत्राची देवता अर्यमा असून ती पितरांचीही देवता आहे.    

- दत्ताराम काणेकर - ज्योतिष भूषण, समुद्रिक शास्त्र भूषण, कल्पतरू

श्रद्धा आणि अंधश्रद्धा    

पितृपक्षातील पंधरवड्यात पितरांच्या स्मरणार्थ पशूपक्ष्यांना जेवण खाऊ घालण्याची प्रथा आहे. एरवी ज्याला अशुभ म्हणून धुडकावून लावले जाते तोच कावळा या दिवसांत 'खास' होतो. श्राद्ध मास सुरू झाल्यानंतर ग्रामीण भागापासून ते शहरात प्रत्येक जण पक्वान्न बनवून कावळ्याला खायला देतात. कावळ्याने ते अन्न खाल्ले, तर पूर्वजांचा आशीर्वाद मिळतो, असाही समज आहे.

सर्वत्र शहरीकरण होत असल्याने कावळ्यांची संख्या पूर्वीच्या तुलनेने कमी झाली आहे. याच पितृपक्षात नाशिकमध्ये तर एका जखमी कावळ्याला पकडून त्याला बळजबरीने घास भरवण्यात येत होता.

सणासुदीच्या काळात असो किंवा कोणतीही पूजाविधी केल्यानंतर गायींनाही नैवेद्य म्हणून अन्न खायला दिले जाते. पण हे अन्न त्यांच्यासाठी घातक असते. गायींसाठी चारा हाच उत्तम आहार असतो. चाऱ्या ऐवजी त्यांना अन्न खायला घातल्यास त्या आजारी पडू शकतात.

संपूर्ण वर्षभरातून एकदा कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि आपल्या हयात नसलेल्या पितरांच्या स्मरणार्थ पितृपक्षात श्राद्ध घालण्याला महत्त्व आहे. या दिवशी सामाजिक कार्य करण्याच्या हेतूने श्रद्धा म्हणून काही जण कावळ्याला, तर काही जण गायींना खाऊ घालतात. अनेक जण या दिवशी गरीबांनाही जेवण देतात.  

- दा. कृ. सोमण - पंचांगकर्ते

श्राद्ध काळात आपण आपल्या पितरांच्या आठवणीत श्रद्धा म्हणून गायींना, कावळ्यांना खाऊ घालतो. हे करताना मरणाच्या दारात असलेल्या एखाद्या व्यक्तीला जीवनदान मिळावे म्हणून आपण अवयवदान करण्याचे ठरवले तर हीच आपल्या पूर्वजांसाठी मोठी श्रद्धांजली नसेल का?


हेही वाचा - 

अंधश्रद्धा म्हणजे अज्ञानच...

राणीबागेतील अजगरावर अंधश्रद्धेतून 'नाणीफेक'


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

पुढील बातमी
इतर बातम्या