दहावी-बारावीचे निकाल जुलैमध्ये लागण्याची शक्यता आहे. पण आता अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला आजपासून सुरुवात करण्यात आली आहे. शिक्षण विभागानं इयत्ता ११ वी महाविद्यालयीन प्रवेशाची प्रक्रिया सुरु केली आहे. यासाठी ऑनलाईन नोंदणी सुरू करण्यात आली आहे.
१ ते १५ जुलैमध्ये ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे. त्यानंतर १५ जुलैपासून निकाल जाहीर होईपर्यंत प्रवेश अर्जाचा पहिला भाग पूर्ण करावा लागेल. निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाचा दुसरा भाग भरता येणार आहे.
यंदाच्या ११वी प्रवेश प्रक्रियेच्या महाविद्यालयीन नोंदणीसाठी उपसंचालक कार्यालयाकडून प्रवेश प्रक्रियेची लिंक ओपन केली जाणार आहे. या लिंकच्या साहाय्यानं महाविद्यालयांनी मागील वर्षी भरलेल्या माहितीत काही बदल करायचे असल्यास करता येणार आहे.
मुंबई महानगर क्षेत्रातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांच्या अकरावी ऑनलाइन प्रवेशांचे लॉग इन आयडी आणि पासवर्ड २०१९-२० मध्ये नोंदणी केलेल्या माहितीतील नोंदणीकृत पत्त्यावर पाठवण्यात येणार आहे. महाविद्यालयांनी त्या लॉग इन, पासवर्डच्या साहाय्यानं ११वी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी कनिष्ठ महाविद्यालयाच्या माहितीमध्ये काही बदल करायचा असल्यास अकरावी ऑनलाइनच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन करायचा आहे.
दरम्यान, दहावीचे निकाल जुलैमध्ये जाहीर होतील असं सांगण्यात आलं होतं. त्याच पार्श्वभूमीवर नोंदणी सुरू करण्यात आली आहे. निकालानंतर विद्यार्थ्यांना महाविद्यालय निवडीची प्रक्रिया करता येणार आहे. निकालानंतर पुढील दीड महिन्यात प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचा सूचनाही शिक्षण विभागाकडून महाविद्यालयांना देण्यात आल्या आहेत.
हेही वाचा