कोरोना व्हायरसमुळे CBSC आणि ICSE बोर्डाच्या दहावी-बारावीच्या उर्वरित परीक्षा रद्द करण्याचा आदेश गुरुवारी देण्यात आला. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांना दिलासा मिळाला आहे. आता CBSC बोर्डानं दहावी आणि बारावीच्या निकालाची तारीख जाहीर केली आहे.
सुप्रिम कोर्टानं जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत साधारण १५ जुलैला निकाल जाहीर करावा असे निर्देश दिले होते. CBSE आणि आयसीएसई यांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितलं की, १५ जुलैपर्यंत निकाल जाहीर होतील.
सर्वोच्च न्यायालयानं सीबीएसईला रद्द झालेल्या परीक्षेसंबंधी विद्यार्थ्यांना गुण देण्यासाठी मूल्यांकन योजनेची अमलबजावणी करण्यास परवानगी दिली आहे. परीक्षा नियंत्रक श्याम भारद्वाज यांनी यावेळी सर्वोच्च न्यायालयाला बारावीच्या विद्यार्थ्यांना आपले गुण वाढवण्यासाठी पर्यायी परीक्षा देण्याची संधी उपलब्ध असेल असं सांगितलं.
दहावी-बारावीचे रद्द करण्यात आलेल्या विषयाच्या पेपरचे मार्क कसे दिले जातील यावर CBSC बोर्डानं आपली बाजू कोर्टात मांडली. त्यानुसार, दिलेल्या परीक्षांमधील बेस्ट ऑफ ३ विषयांवरून रद्द झालेल्या विषयांना मार्क दिले जाणार आहेत. ज्यांनी ३ परीक्षा दिल्या आहेत त्यांना 2 परीक्षांमधून बेस्ट ऑफ मार्क दिले जाणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी एक किंवा दोनच परीक्षा दिल्या आहेत त्यांना प्रॅक्टिकलच्या बेसवर गुणांकन केलं जाणार आहे.