कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी गणपती विसर्जनावेळी तलावांवर होणारी गर्दी कमी करण्याचा नवी मुंबई महापालिकेचा प्रयत्न आहे. यासाठी नवी मुंबई महापालिका शहरात १३० कृत्रिम तलाव उभारणार आहे. हे तलाव तयार करण्यासही पालिकेने सुरुवात केली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी यंदा गणेशोत्सव साध्या पद्धतीनं साजरा करण्याचं आवाहन राज्य शासनाच्या वतीने करण्यात आलं आहे. त्यामुळे यंदा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे दीड दिवसांचा गणेशोत्सव साजरा करणार आहेत. विसर्जनावेळी गर्दी होऊ नये म्हणून नवी मुंबई महापालिकेने शहरात कृत्रिम तलाव तयार करण्यास सुरुवात केली आहे. शहरातील उद्याने, मैदाने आणि मोकळ्या जागा या तलावांसाठी निश्चित करण्यात आल्या आहेत. शहरातील नैसर्गिक तलावांचा वापर टाळण्यावर पालिकेचा भर राहणार आहे.
कृत्रिम तलावाांमध्ये चार फुटांपर्यंतच्या मूर्तीचं विसर्जन करता येणार आहे. हे तलाव १० बाय १२ फूट रुंद आणि चार फूट खोल असतील. तसंच विसर्जनानंतर कृत्रिम तलाव घडी घालून ठेवता येणार आहेत.
येथे असतील तलाव
बेलापूर - १५
नेरुळ - २७
वाशी - १६
तुर्भे - १७
कोपरखैरणे - १४
घणसोली - १७
ऐरोली - २२
दिघा - ७