देशाचं राष्ट्रगीत असताना ‘वंदे मातरम्’ची सक्ती का?, राष्ट्रगीत म्हणणारे सर्वजण भारतीय आहेत, असं म्हणत वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मित्रपक्ष ‘एमआयएम’प्रमाणे ‘वंदे मातरम्’ला विरोध दर्शवला आहे. परभणीमध्ये झालेल्या एका पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. आंबेडकरांच्या या वक्तव्यामुळे नवीन वादाला तोंड फुटलं आहे.
देशात राष्ट्रगीत गायले जातं ना मग 'वंदे मातरम' कशाला हवं? काहीतरी एकच म्हणा ना. राष्ट्रगीत म्हणणारे सर्वच जण भारतीय आहेत. त्यामुळे 'वंदे मातरम्'ला आमचाही विरोध आहे, असं मत त्यांनी व्यक्त केलं. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे किशन चव्हाण, जिल्हाध्यक्ष डॉ. प्रवीण कनकटे यांची उपस्थिती होती.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाने मुस्लिम समाजाचा फक्त मतांसाठी वापर केला. सत्तेपासून दूर ठेवण्याचं काम त्यांनी केलं आहे. या प्रवृत्तीला भाजपाही खतपाणी घालतं. शिवाय धर्म आणि जातीच्या आधारे राजकारण केलं जात आहे. सध्या द्वेषाचं राजकारण सुरू आहे. सत्तेसाठी स्पर्धा चांगली, पण सत्तेसाठी सर्वच बरोबर असेल, असं नाही असं मत त्यांनी व्यक्त केलं.
काँग्रेस बरोबर केवळ एकदाच बातचीत झाली आहे. काँग्रेसचे सर्व निर्णय दिल्लीच्या हातात आहे. त्यामुळे येथील पक्षाध्यक्ष काहीच करू शकत नाही, याचा प्रत्यय आला असून काँग्रेसबरोबर गेलो तरी एमआयएमची साथ सोडणार नाही. ही युती तुटणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
हेही वाचा -
शरद पवार खोटारडे- प्रकाश आंबेडकर
वंचित बहुजन आघाडीच्या बॅनरखाली प्रकाश आंबेडकरांची एेक्याची हाक