विधानसभा निवडणुकांची तारीख जाहीर होण्याआधीच मुंबई काँग्रेसचा पाय खोलात गेलेला दिसतोय. काँग्रेस नेत्यांमध्ये जिंकण्याची उमेद तर सोडाच पक्षात टिकून राहण्याचीही आस उरलेली नाहीय. जिथं अप्पलपोटे नेतेच पक्षाशी गद्दारी करताहेत तिथं कार्यकर्त्यांकडून प्रामाणिकपणाची अपेक्षा तरी कुणी कशी करू शकतं? असा खडा सवाल काँग्रेस कार्यकर्त्यांचा आहे. कार्यकर्त्यांच्या या नाराजीला कारण ठरलंय ते पक्षबदलू, जबाबदारीपासून पळ काढणारे आणि एकमेकांच्या तंगड्यात तंगड्या अडकवणारे काँग्रेस नेते.
मुंबई काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष आणि काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी आपल्या पदाचा काही दिवसांपूर्वीच राजीनामा दिला. राजीनामा देताना मुंबई काँग्रेसचं नेतृत्व करण्यासाठी तीन सदस्यीय समितीची नेमणूक करण्याचा सल्लाही त्यांनी पक्षश्रेष्ठींना दिलाय. परंतु त्यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा उफाळून आलाय. देवरा आणि मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरूपम यांच्यात टोकाचे मतभेद आहेत. हे मतभेद देखील यानिमित्ताने समोर आलेत.
अर्थातच निरूपम यांचा हा टोमणा देवरा समर्थकांना कसा पचेल? त्यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेस नेते भाई जगताप यांनी निरूपम यांच्यावर प्रतिहल्ला चढवला. काही नेते काँग्रेसी असल्याचा दावा करतात. पण तेच जातीयवाद आणि भाषावादाचं राजकारण करतात. ते अन्य नेत्यांचा अपमान करतात आणि त्यांच्याच मतदारसंघातून निवडणूक लढवतात. इतकं सगळं करूनही तब्बल अडीच लाखांहून अधिक मतांनी पराभूत होतात. अशा 'कर्मठ' नेत्यांपासून सावध राहायला हवं. अशा शब्दांत जगताप यांनी निरूपम यांच्या वर्मावर बोट ठेवलं.
तसं बघायला गेल्यास बिनधास्त आणि बेधडक वृत्तीचे निरूपम मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष असताना काँग्रेस कार्यकर्ते नेहमीच चार्ज असायचे. नोटाबंदी विरोधात केलेलं आंदोलन, महागाई-वीजदरावाढीविरोधात केलेलं आंदोलन, पकोडा आंदोलन असो किंवा फेरीवाल्यांची बाजू घेऊन मनसेशी घेतलेला पंगा असो काँग्रेस कार्यकर्ते सातत्याने निरूपम यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर उतरण्यासाठी सज्ज असायचे. छटपूजा आयोजनाच्या माध्यमातून तर त्यांनी कार्यकर्त्यांना नवा इव्हेंटही उपलब्ध करून दिला. पदाधिकाऱ्यांसोबत कार्यकर्त्यांसाठी नेहमीच अॅव्हेलेबल असलेले निरूपम म्हणूनच सर्वांना जवळचे वाटायचे. याच जोरावर निरूपम आपल्यापाठी उत्तर भारतीयांसोबत एकनिष्ठ कार्यकर्त्यांची लाॅबी तयार करू शकले.
एकेकाळी मुंबई काँग्रेसमध्ये गुरूदास कामत आणि दुसऱ्या बाजूला मुरली देवरा असे दोनच गट होते. मुरली देवरा यांच्यानंतर हा वारसा मिलिंद देवरांकडे आला. निरूपम मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष झाल्यावर मुंबई काँग्रेसमध्ये ३ गट तयार झाले. २०१८ मध्ये कामत यांच्या निधनानंतर कामत गटातील बहुतेक पदाधिकारी देवरांच्या गोटात सामिल झाले. तेव्हापासून देवरा विरूद्ध निरूपम असा कलगीतुरा सुरू झाला.
हेही वाचा-राज यांना हाताची साथ? दिल्लीत घेतली सोनिया गांधींची भेट
राष्ट्रवादीसोबतची आघाडी फायद्याची की तोट्याची, वंचित बहुजन आघाडीचं उभं ठाकलेलं आव्हान, मनसेची निवडणुकीतली भूमिका असा सगळा गुंता सद्यस्थितीत काँग्रेसला सोडवायचाय. त्यादृष्टीकोनातून पाहता एलिट क्लासमध्ये रमणाऱ्या देवरांकडे ही मोठी संधी होती. तळागाळातील कार्यकर्त्यांसोबत रस्त्यावर उतरून त्यांची मोट बांधता आली असती, त्यांना प्रोत्साहीत करता आलं असतं. विधानसभेसाठी रणनिती आखता आली असती. पण देवरांनी ही संधी हातची गमावली. आधी निरूपम यांना खाली खेचलं आणि नंतर स्वत: कुठलीही कर्तबगारी न दाखवता पदावरून पायउतार झाले. ‘तुला न मला घाल कुत्र्याला’ असा हा प्रकार काँग्रेस कार्यकर्त्यांना खासकरून निरूपम समर्थकांना रूचलेला नाही. त्यातच काँग्रेस नेत्या उर्मिला मातोंडकरच्या ‘लेटर बाॅम्ब’ने काँग्रेस कार्यकर्त्यांच्या नाराजीत आणखीनच भर पडलीय.
या ९ पानी पत्रात उर्मिलाने आपल्या पराभवाचं सर्व खापर काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांवर फोडलंय. स्थानिक काँग्रेस नेत्यांमधील मतभेद, स्थानिक स्तरावर नेतृत्वाची कमी, कमकुवत प्लानिंग आणि संजय निरूपम यांच्या कार्यकर्त्यांनी मनापासून प्रचाराचं न केलेलं काम यामुळे आपला पराभव झाल्याचं उर्मिलाने या पत्रात म्हटलंय. हे पत्र उघड झाल्याने नाराज उर्मिला काँग्रेसचा हात सोडून भाजपाचा झेंडा खांद्यावर घेईल किंवा शिवबंधनात अडकेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगलीय.
हेही वाचा- वंचित पुढे काँग्रेसच वंचित? ४० जागांचा प्रस्ताव देऊन केली थट्टा
या पत्रासोबतच उर्मिलाचं काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांना लिहिलेलं आणखी एक पत्रंही समोर आलं. या पत्रात 'राहुल गांधी यांच्या सन्मानार्थ मिलिंद देवरा यांनी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा दिलेला राजीनामा स्वीकारू नये. कारण मुंबई काँग्रेसला मिलिंद देवरांसारख्या नेत्याची गरज आहे', असं लिहिलेलं आहे.
राधाकृष्ण विखे पाटलांनी ऐन मोक्याच्या क्षणी भाजपात जात मंत्रीपदाची माळ गळ्यात पाडून घेतल्यापासून तर राज्यातील इतर काँग्रेस नेत्यांची अवस्था आणखीच दयनीय झालीय. विखेंसोबत डझनभर मंत्री भाजप-शिवसेनेत जाण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बाधून उभे होते. परंतु यापैकी कुणाचीही डाळ शिजू शकली नाही. त्यामुळे या नेत्यांची अवस्था कुणी पक्षात घेतं का पक्षात? अशी आर्त हाक मारणाऱ्या भंगण फकीरासारखी झालीय. सत्ताधाऱ्यांचे उंबरठे झिजवत करूण नजरेने फिरणारे काँग्रेस नेते कार्यकर्त्यांना आणखीनच खुजे वाटू लागलेत.
अशा स्थितीत काँग्रेस कार्यकर्त्यांना आपल्याच पक्षाच्या मुळाशी उठलेल्या काँगेस नेत्यांच्या नौंटकीकडे बघत राहण्यावाचून कुठलाच पर्याय उरलेला दिसत नाहीय.
हेही वाचा-
मुंबई काँग्रेसमध्ये गटबाजीला पुन्हा उधाण, ‘हे’ काँग्रेसचे नेतेच करताहेत एकमेकांवर चिखलफेक
मिलिंद देवरा यांनी दिला मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
Disclaimer: All views expressed in this article are personal and purely as per the author. Mumbai Live holds no opinion on the content of the article and does not promote any particular view or sentiment.