सरकार बनवण्यावर एकमत, पण चर्चेचं गुऱ्हाळ सुरूच राहणार

महाराष्ट्रात नव्या सरकारचा पर्याय देण्यावर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचं एकमत झालं असून सत्ता स्थापनेसंदर्भातील चर्चा शनिवारी देखील सुरूच राहणार असल्याची माहिती काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. चर्चा पूर्ण झाल्यावर तिन्ही पक्षाकडून अधिकृतरित्या पत्रकार परिषद घेऊन त्यासंदर्भातील माहिती देण्यात येईल, असंही ते म्हणाले.

हेही वाचा- मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरेंच्या नावालाच पसंती - शरद पवार

शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांची महाबैठक शुक्रवारी सायंकाळपर्यंत सुरूच होती. ही बैठक संपल्यानंतर बाहेर आलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, सरकार स्थापनेसंदर्भातील तिन्ही नेत्यांमध्ये सकारात्मक चर्चा झाली. अनेक मुद्द्यांवर तिन्ही नेत्यांचं एकमत झालं असलं, तरी अजून काही मुद्द्यांवर चर्चा शिल्लक आहे. त्यामुळे शनिवारीही बैठकीचं सत्र सुरूच राहील. 

दरम्यान या बैठकीतून बाहेर आल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार प्रसारमाध्यमांना माहिती देताना म्हणाले की, नव्या सरकारचं नेतृत्व मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी करावं, याबद्दल तिन्ही पक्षांचं एकमत झालं आहे. परंतु अद्याप शिवसेनेकडून या मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनीही मुख्यमंत्रीपदाबाबत अंतिम निर्णय झाला नसल्याची माहिती दिली.


हेही वाचा-

नवं सरकार ६-८ महिनेच टिकेल, नितीन गडकरींचं भाकीत

मोठ्या शत्रूला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठीच शिवसेनेला जवळ- अबू आझमी


पुढील बातमी
इतर बातम्या