भाजपा सरकार सनातन संस्थेसारख्या कट्टरवादी हिंदू संस्थांकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करत आहे. हा प्रकार समाजासाठी अत्यंत घातक असल्याने सनातन संस्थेवर तातडीने बंदी घालण्याची मागणी माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी रविवारी केली.
महाराष्ट्र दहशातविरोधी पथका(एटीएस) ने नालासोपारा इथून वैभव राऊस यााच्यासह शरद कळसकर आणि सुधन्वा गोंधळेकर अशा एकूण तिघांना १० आॅगस्ट रोजी अटक केली. वैभव राऊतकडून 'एटीएस'ने तब्बल २० गावठी बाॅम्ब अणि ५० गावठी बाॅम्ब तयार होतील इतकं स्फोटक साहित्यही जप्त केलं.
वैभव राऊत सनातन संस्थेचा तथाकथिक साधक असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र सनातन संस्थेने वैभव त्यांचा साधक नसल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. त्याचसोबत कळसकर आणि गोंधळेकर यांचा हिंदू जनजागृती समितीचे कार्यकर्ते असल्याचं म्हटलं जात आहे. यावर पोलिसांकडून अजून बरेच खुलासे व्हायचे आहेत.
हे सर्व कनेक्शन म्हणजे कट्टर हिंदूत्ववाद्यांकडून धर्मनिरपेक्ष पक्षांमध्ये फूट पाडण्याचा डाव असल्याचं चव्हाण यांचं म्हणणं आहे. सरकारने या संस्थांकडे दुर्लक्ष केल्यानेच या संस्था समाजात कट्टरवादाचं विष पसरवत असल्याने या संस्थेवर बंदी घालण्याची मागणी चव्हाण यांनी केली.
या अगोदर माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. दहशतवाद पसरवणाऱ्या कट्टर संस्थांविरोधात भाजपा सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) का कारवाई करत नाहीय. कट्टरवाद हा कट्टरवादच असतो, मग तो कुठल्याही धर्माचा का असेना. त्यामुळे अशा कट्टरवादी संस्थावर कारवाई व्हायलाच हवी, असंही चिदंबरम म्हणाले.
याप्रकरणी तिन्ही आरोपींना १८ आॅगस्टपर्यंत पोलिस कोठडीत पाठवण्यात आलं आहे.
हेही वाचा-
आता तरी सनातन संस्थेवर बंदी येणार का?
वैभवच्या ट्विटर अकाऊंटहूनही संशयास्पद संदेश