भिमा-कोरेगाव दंगलप्रकरणातील आरोपी संभाजी भिडे यांना अटक व्हावी आणि अॅट्रॉसिटी कायद्यासह अन्य काही मागण्यांसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)कडून २ मे रोजी मोर्चाची हाक देण्यात आली आहे. हा मोर्चा २ मे रोजी दुपारी एक वाजता वांद्र्यातील म्हाडा कार्यालय येथून निघणार असून हा मोर्चा वांद्र्यातील उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर धकडणार आहे. त्यानंतर संविधान बंगल्यासमोर रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांची तिथे सभा होणार असल्याची माहिती रिपाइं (आठवले)चे मुंबई प्रदेश अध्यक्ष गौतम सोनावणे यांनी दिली आहे.
१ जानेवारी रोजी भिमा-कोरेगाव येथे दंगल झाली आणि मग त्याचे पडसाद मुंबईसह राज्यभर उमटले. ३ जानेवारीला महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. तर या दंगलीतील आरोपी संभाजी भिडे यांना अटक व्हावी या मागणीसह अॅट्रॉसिटीतील बदलाच्याविरोधात भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी २६ मार्चला एल्गार मोर्चा काढला होता. आता त्यानंतर आठवले यांनी भिडे यांना अटक व्हावी आणि अॅट्रॉसिटीतील बदलासाठी २ मे रोजी मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. या मोर्चात मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी होती, असा दावा सोनावणे यांनी केला आहे.
भिडेंना अटक व्हावी ही मागणी आहेच पण त्याचबरोबर नुकताच या प्रकरणातील साक्षीदार पूजा सकट हिचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या संशयाची मागणीही यावेळी करण्यात येणार आहे. दरम्यान रिपाइं (आठवले) गटाला इतक्या उशिरा भिमा-कोरेगाव दंगल आणि अॅट्रॉसिटीबाबत मोर्चा काढण्याची आठवण का झाली? असा प्रश्न यानिमित्तानं उपस्थित केला जात आहे. याविषयी सोनावणे यांना विचारले असता ३ जानेवारीच्या बंदमध्ये आम्ही आणि आमचे कार्यकर्ते सहभागी होतो आणि आम्ही वेळोवेळी आमची भूमिका मांडत आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
हेही वाचा -
संभाजी भिडे मोकाट का? विरोधकांचा सवाल