कोरेगाव-भीमा दंगलीतील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना येत्या ८ दिवसांत अटक करा, नाहीतर सोमवारच्या एल्गार मोर्चापेक्षाही तीव्र आंदोलन करू. मग जे काही होईल त्याला सरकार जबाबदार असेल, असा कडक इशारा भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी राज्य सरकारला दिला.
भिडेंच्या अटकेच्या मागणीसाठी अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी भायखळा ते विधानभवन अशी एल्गार मोर्चाची हाक दिली. त्यानुसार मुंबईसह राज्याच्या कानाकोपऱ्यातून कार्यकर्ते आले होते. या मोर्चाला संभाजी ब्रिगेड, शेतकरी संघटना, डावे पक्ष, भीम आर्मी, मुस्लिम संघटनांसह अन्य संघटनांनीही पाठिंबा दिला होता.
पोलिसांकडून ऐनवेळी या मोर्चाला परवानगी नाकारण्यात आल्याने आंबेडकरी अऩुयायांनी आझाद मैदानावर मोठ्या संख्येने जमत भिडेंना अटक होत नसल्याबद्दलचा संताप व्यक्त केला. या मोर्चाची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेत आंबेडकरांसह ५ जणांच्या शिष्टमंडाळाला दुपारी साडे तीन वाजता चर्चेसाठी बोलावलं होतं.
या चर्चेत आंबेडकरांनी भिडेंच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांचं अल्टीमेटम दिलं. भिडेंच्या अटकेसाठी आंदोलन सुरूच राहणार असून ८ दिवसांत त्यांना अटक न झाल्यास पुन्हा रस्त्यावर उतरण्याचा इशारा आंबेडकरांनी दिला.
आम्ही मुख्यमंत्रीच्या आश्वासनाने समाधानी नाही. सरकारने न्यायाधीशांचं काम सोडावं, भीमा कोरेगावचा डाग पुसायचा असेल, तर मुख्यमंत्र्यांनी भिडेंवर ताबडतोब कारवाई करावी. भिडे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी पाठीशी घालत आहेत. त्यांच्यावर कारवाई झाली नाही, तर कुणाच्या शेपटीवर कधी पाय द्यायचा ते आम्हाला माहीत आहे.
- अॅड. प्रकाश आंबेडकर, भारिप रिपब्लिकन बहुजन महासंघ
रावसाहेब पाटील यांनी १ जानेवारीला मुख्यमंत्र्यांचा खून करा, अशी फेसबुकवर पोस्ट टाकली होती. या पोस्टवर कारवाई करून भिडेंपर्यंत पोहोचणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती आंबेडकरांनी दिली.
जे पोलिस मुख्यमंत्र्यांची सुरक्षा करू शकत नाही ते सर्वसामान्यांची काय सुरक्षा करणार? अशी टीकाही त्यांनी केली.
हेही वाचा-
संभाजी भिडे मोकाट का? विरोधकांचा सवाल
पोलिसांच्या चुकीमुळे वाहतूककोंडी- आंबेडकर