श्री गणरायांचे आगमन अवघ्या काही दिवसांवर येवून ठेपले असून बाप्पांची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी उत्सव मंडळांच्या वतीने मंडप बांधण्याची लगबग सुरु झाली आहे. परंतु, मुंबईतील अनेक गणेशोत्सव मंडळांना मंडपांसाठी परवानगीच मिळालेली नाही. बुधवारपर्यंत केवळ १७ उत्सव मंडळांनाच परवानगी दिलेली आहे. तर ६० मंडळांना परवानगी नाकारली गेली असल्याचं उघड झालं आहे.
मंडळांच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या मंडपांना सध्या तरी परवानगी दिली जात नसून १६ ऑगस्टपर्यंत महापालिकेकडे एकूण ७३८ गणेशोत्सव मंडळांचे अर्ज आले होते. त्यातील आतापर्यंत केवळ १७ उत्सव मंडळांच्या मंडपांनाच परवानगी देण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या वतीने देण्यात आली आहे.
प्राप्त झालेल्या अर्जापैकी ६० मंडळांच्या मंडपांना परवानगी नाकारण्यात आली आहे. तर उर्वरीत ५८० मंडपांचे अर्ज परवानगीच्या प्रतीक्षेत आहेत. हे अर्ज प्राप्त झाल्यानंतर ते स्थानिक पोलिस, वाहतूक पोलिस यांच्याकडे पाठवले जातात. त्यांची एनओसी मिळाल्यानंतरच परवानगी दिली जाते, असे सार्वजनिक उत्सव मंडळाचे महापालिका समन्वयक तसेच उपायुक्त आनंद वाघ्राळकर यांनी स्पष्ट केले.
मालाड पी-उत्तर विभाग आणि दादर-धारावीतील जी-उत्तर विभागातील प्रत्येकी २२ उत्सव मंडळांच्या मंडपांची परवानगी नाकारण्यात आली आहे. पी-उत्तरमधून ८६ मंडळांनी मंडपासाठी अर्ज केला होता. त्यातील २२ मंडळांची परवानगी नाकारली आहे. तर दादर-माहीम-धारावीतून ९४ मंडळांनी अर्ज केला होता. त्यातील २२ मंडळांच्या परवानगी नाकारल्या आहेत.
गणेशमूर्ती बनवण्यासाठी, तसेच विक्री करण्यासाठी २८६ मूर्तिकारांनी मंडपांसाठी अर्ज केला होता. त्यातील १०४ मूर्तिकारांच्या मंडपांना परवानगी दिलेली आहे. तर ९३ मूर्तिकारांना परवानगी नाकारण्यात आल्याचेही वाघ्राळकर यांनी सांगितले.
हेही वाचा