चालू २०१८ हे सर्वात उष्ण वर्ष म्हणून नोंदवलं गेलं आहे. वर्ल्ड मेटेओरॉलॉजिकल ऑर्गनायझेशन (डब्ल्यूएमओ) या संस्थेने केलेल्या नोंदणीतून हे स्पष्ट झालं आहे. यावर्षी भारतासह जगभरातल्या लोकांना चढता उष्मा, हवामानात अचानक झालेले बदल यांचा सामना करावा लागला.
मागील चार वर्षांपासून सुरू असलेला उष्णतेचा ट्रेंड यावर्षीही कायम राहिला. पृथ्वीचं तापमान 2 अंश सेल्सियसने वाढू नये, असं लक्ष्य 2015 मध्ये झालेल्या पॅरिसमधल्या हवामान बदलाच्या परिषदेत स्पष्ट करण्यात आलं होतं. तरीदेखील गेल्या चार वर्षांपासून पृथ्वीची तापमानवाढ 1.5 अंश सेल्सियसपर्यंत गेली, अशी माहिती तज्ज्ञांनी दिली.
पृथ्वीचं तापमान वाढवणाऱ्या प्रदूषणयुक्त वाऱ्याच्या प्रमाणात प्रचंड वाढ झाल्याने हवामान उष्ण झालं. शिवाय पुरांचं वाढतं प्रमाण यामुळे संपूर्ण जगालाच संकटाचा सामना करावा लागत आहे.
वातारणात झालेले बदल या वर्षी अधिक स्पष्टपणे दिसून आलं. शिवाय समुद्राच्या पातळीत वाढ झाल्याने तापमानात वाढ आणि त्या पाण्यातील वाढलेले आम्लांचे प्रमाण हे देखील यावर्षी दिसून आले.
हवामानात झालेला बदलच ऑगस्टमध्ये केरळमध्ये झालेल्या पुराला कारणीभूत होता. यापूर्वी १९२० मध्ये केरळला पुराचा तडाखा बसला होता. त्यानंतर यावर्षी केरळमधील जनतेला पुराचा सामना करावा लागला. या महापुरामुळे १४ लाख लोक बेघर झाले. याव्यतिरिक्त ग्रीसमधील अथेन्स शहराला आणि ब्रिटिश कोलंबिया भागातही वणवा लागला होता.