मुंबईतील कोरोनाच्या रुग्ण संख्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी महापालिका शर्तीचे प्रयत्न करत आहे. परंतु, मुंबईतील कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होऊ लागली आहे. त्यामुळं महापालिकेनं अॅण्टिजन टेस्टवर भर देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, महापालिका दररोज ७ हजरांहून अधिक टेस्ट करत आहे. परंतु, या चाचण्यांमधून रुग्ण बाधित आढळण्याचे प्रमाण केवळ ६ टक्क्यांपर्यंत आहे.
महापालिका दररोज १५ हजारांवर चाचण्या करत आहे. मात्र यात सुमारे ७ हजार चाचण्या अॅण्टिजन आहेत. आतापर्यंत पालिकेने ९ लाखांच्या आसपास चाचण्या केल्या आहेत. त्यापैकी सुमारे १ लाख चाचण्या अॅण्टिजन आहेत. मात्र या चाचण्यांमधून बाधितांचे अहवाल निश्चित करण्याचे प्रमाण मात्र कमी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १५,७०० चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी अॅण्टिजन चाचण्या ७३०० होत्या. त्यापैकी सुमारे ६ टक्के अहवाल बाधित आले आहेत.
यानुसार, केवळ ४५० जणांचे अहवाल बाधित दाखवले आहेत, तर घशातून स्राव घेऊन केल्या जाणाऱ्या आरटी-पीसीआर चाचण्यांचे प्रमाण ८४०० इतके असून त्यातील अहवाल बाधित येण्याचे प्रमाण हे तब्बल २५ टक्के आहे. त्यानुसार, २१०० रुग्णांचे अहवाल बाधित आले आहेत. हा फरक प्रचंड मोठा असल्यामुळे प्रतिजन चाचण्यांमुळे केवळ चाचण्यांचे लक्ष्य गाठणे पालिकेला शक्य होते आहे.
अचूकता कमी असल्याने रुग्णांचा शोध घेण्यात फारसे यश येत नाही. करोनाची लक्षणे असलेल्या रुग्णांचे नमुनेदेखील प्रतिजन चाचण्यांमध्ये नकारात्मक येत असल्यामुळे अशा सर्व संशयित रुग्णांची आरटी-पीसीआर चाचणी करण्याची सूचना नुकतीच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केली. आरटी-पीसीआर चाचणीचा निष्कर्ष येण्यासाठी एक-दोन दिवस लागतात. परंतु प्रतिजन चाचणीचे निष्कर्ष अध्र्या तासात येतात. तसेच ही चाचणी तुलनेने स्वस्त आहे.