मुंबईत कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. ही वाढ लक्षात घेता महापालिकेनं मुंबईकरांना कोरोनाचा संसर्ग पसरू नये यासाठी मस्कचा वापर करण्याचा आदेश दिले. मात्र, याबाबत वारंवार सूचना करूनही मुंबईतील अनेक जण मस्कचा वापर करत नाहीत. अशा तब्बल १४ हजारांहून अधिक व्यक्तींकडून ५२ लाख ७६ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
जनजागृती करूनही मस्कचा वापर टाळणाऱ्यांविरुद्ध भविष्यात कारवाई तीव्र करण्यात येणार असल्याचे महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी सार्वजनिक ठिकाणी वावरणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने मस्कचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे. मस्कचा वापर न करणाऱ्यांना १ हजार रुपये दंड करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार एप्रिल ते १२ सप्टेंबर या काळात मुखपट्टीचा वापर न करणाऱ्या ४ हजार ९८९ जणांकडून ३३ लाख ६८ हजार ५०० रुपये दंड वसूल करण्यात आला.
दंडाची रक्कम अधिक असल्यामुळ पालिकेवर टीका करण्यात येत होती. तसेच दंडात्मक कारवाई करणारे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांशी वादही घालत होते. ही बाब लक्षात घेऊन पालिकेने १२ सप्टेंबर रोजी दंडाची रक्कम १ हजार रुपयांवरून २०० रुपये केली. त्यानंतर १३ ते २६ सप्टेंबर या काळात पालिकेने मस्कचा वापर न करणाऱ्या नऊ हजार २१८ नागरिकांवर कारवाई करीत १९ लाख ७ हजार ७०० रुपये दंड वसूल केला.
मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत एकूण १४ हजार २०७ नागरिकांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली असून या सर्वाकडून वसूल केलेली ५२ लाख ७६ हजार २०० रुपये रक्कम पालिकेच्या तिजोरीत जमा करण्यात आली आहे.