मुंबईमध्ये दिवसेंदिवस वाहतूककोंडीची समस्या वाढत चालली असून पादचाऱ्यांना रस्ता ओलांडणंही आता जिकरीचं बनलं आहे. पादचाऱ्यांना सुरक्षित रस्ता ओलांडता यावा यासाठी आता महापालिका डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर शीव ते लालबाग दरम्यान ४ पादचारी पूल बांधणार आहे.
या आर्थिक वर्षात महापालिका एकूण ५ पादचारी पूल बांधणार आहे. त्यातील गिरगाव चौपाटी वगळता सर्व पादचारी पूल डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर बांधले जाणार आहेत. यामुळे परळवासीयांना आता हा रस्ता ओलांडण्यासाठी पुलाचा सुरक्षित पर्याय उपलब्ध होणार आहे.
मुंबईतील वाहनांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्यामुळे वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी महापालिकेने शहरातील वाहतुकीचा ‘सर्वसमावेशक चलनशीलता आराखडा’ तयार केला आहे. साऊथ एशियाच्या 'ली असोसिएट्स' या सल्लागाराने बनवलेल्या अहवालात विविध ठिकाणी पूल बांधण्याच्या सूचना केल्या आहेत.
त्यानुसार त्या त्या ठिकाणची तांत्रिकदृष्टया तपासणी करून पुढील कार्यवाही करण्यात येत आहे. त्यानुसार यावर्षी ५ पादचारी पूल, ५ भुयारी मार्ग बांधण्यात येणार आहेत. याशिवाय १ पादचारी पूल आणि २ स्कॉयवॉकवर सरकते जिने बसवण्यात येणार असल्याची माहिती पूल विभागाचे प्रमुख अभियंता शितलाप्रसाद कोरी यांनी दिली.
मुंबईत 'एमएमआरडीए'ने ५६ स्कॉयवॉक बांधले आहेत. हे सर्व स्कायवॉक 'एमएमआरडीए'ने महापालिकेला हस्तांतरीत केले आहेत. त्यामुळे मुंबईतील सर्व स्कायवॉकला सरकते जिने बसवण्याची शक्यता तपासून पाहण्यासाठी महापालिका सल्लागाराची नियुक्ती करत आहे. सल्लागाराच्या अहवालानंतर जिथे जिथे शक्य आहे, तिथे सरकते जिने बसवणार असल्याचंही कोरी यांनी स्पष्ट केलं.
काँग्रेसच्या माजी नगरसेविका सुषमा साळुंखे यांनी, वाहतूककोंडीवर मात करण्यासाठी आणि गर्दीच्या ठिकाणी पादचाऱ्यांना रस्ता ओलांडणं सुलभ व्हावं म्हणून महापालिकेकडून सरकत्या जिन्यासह पादचारी पूल आणि भुयारी मार्ग बांधण्यात यावेत, अशी मागणी मागील वर्षी ठरावाच्या सूचनेद्वारे केली होती. त्यानुसार महापालिका सभागृहात ठराव करून प्रशासनाकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठवून देण्यात आला.