Advertisement

धारावी पुनर्विकासात मिठी नदीच्या पुनरुज्जीवनावर भर

3.3 किमी रिव्हरफ्रंट, 40 हजार झाडांचे संवर्धन, हरित नेटवर्क उभारणार

धारावी पुनर्विकासात मिठी नदीच्या पुनरुज्जीवनावर भर
SHARES

धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत (DRP) मिठी नदीच्या पुनरुज्जीवनाला केंद्रस्थानी ठेवत विस्तृत ग्रीन-ब्ल्यु (Green-Blue) नेटवर्क विकसित करण्यात येणार आहे. या योजनेत सुमारे 40 हजार झाडांचे संवर्धन, 3.3 किमी लांबीचा सार्वजनिक रिव्हरफ्रंट प्रोमेनेड, तसेच परस्पर जोडलेली उद्याने आणि हरित मार्गिका (Green Corridors) विकसित करण्याचा प्रस्ताव आहे.

हवा, पर्यावरण आणि सार्वजनिक जागांवर भर

धारावी पुनर्विकासाची अंमलबजावणी करणाऱ्या अदानी नवभारत डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड (ANDPL) नुसार, यामुळे:

  • हवेची गुणवत्ता सुधारेल

  • शहरातील वाढते तापमान कमी होण्यास मदत होईल

  • जैवविविधतेला चालना मिळेल

  • नागरिकांना अधिक खुल्या आणि हिरव्या सार्वजनिक जागा उपलब्ध होतील

3.3 किमीचा मिठी नदीकिनारी सार्वजनिक रिव्हरफ्रंट

या प्रकल्पांतर्गत माटुंगा कल्व्हर्ट ते मिठी नदीकिनारा असा 3.3 किलोमीटर लांबीचा सार्वजनिक प्रोमेनेड उभारण्यात येणार आहे.

या रिव्हरफ्रंटवर:

  • व्ह्यूइंग डेक

  • कॅफे

  • सांस्कृतिक उपक्रमांसाठी जागा

असणार असून, नदीचे नैसर्गिक पर्यावरण जपण्यावर भर दिला जाणार आहे.

नदीकाठावर स्थानिक प्रजातींची झाडे आणि प्रदूषण शोषून घेणारी वनस्पती लावली जाणार आहेत. तसेच पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यासाठी परमिएबल पेव्हिंग आणि बायोस्वेल्स उभारून पूरनियंत्रण, भूजल पुनर्भरण आणि नदीच्या परिसंस्थेचे संरक्षण करण्याचे नियोजन आहे.

15 मीटर रुंदीचा 'ग्रीन स्पाईन'

मिठी नदीकिनारा हा 15 मीटर रुंदीच्या ग्रीन स्पाईन, सेंट्रल पार्क आणि धारावीतील विविध परिसरांमध्ये उभारण्यात येणाऱ्या उद्यानांशी जोडला जाणार आहे.

या नेटवर्कमुळे:

  • पादचारी आणि सायकलस्वारांसाठी स्वतंत्र मार्ग

  • हवेचा प्रवाह सुधारण्यास मदत

  • 'अर्बन हीट आयलंड' प्रभाव कमी होणे

  • स्वच्छ, आरोग्यदायी आणि सहज उपलब्ध सार्वजनिक जागा निर्माण होणार आहेत.

40 हजार झाडांचे संवर्धन, MMRमध्ये 2 लाख झाडांची लागवड

प्रकल्पासाठी काही झाडे हटवावी लागणार असली तरी, त्याच्या बदल्यात सुमारे 40 हजार झाडांचे संवर्धन व टप्प्याटप्प्याने लागवड करण्यात येणार आहे. याशिवाय मुंबई महानगर प्रदेशात (MMR) जवळपास 2 लाख भरपाई स्वरूपातील झाडे लावण्याचे नियोजन आहे.

मुंबई महापालिकेच्या हद्दीत पुरेशी जागा उपलब्ध नसल्याने पालघर जिल्ह्यातील चाहाडे गावात आतापर्यंत 30 हजार झाडांची लागवड करण्यात आली आहे. यंदाच्या पावसाळ्यात आणखी 75 हजार झाडे लावण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

पाच वर्षे देखभाल

झाडांच्या लागवड आणि देखभालीसाठी टेराकॉन (Terracon) या पर्यावरण सल्लागार संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे. ही संस्था:

  • वैज्ञानिक पद्धतीने लागवड

  • सिंचन

  • झाडांचे संरक्षण

  • पाच वर्षांची देखभाल

  • दर सहा महिन्यांनी झाडांच्या अस्तित्वाचा अहवाल

सादर करणार आहे. या संपूर्ण उपक्रमाचा खर्च ANDPL उचलणार आहे.

अदानी नवभारत डेव्हलपर्सच्या मते, मिठी नदीचे पुनरुज्जीवन, मोठ्या प्रमाणावरील वृक्षलागवड आणि परस्पर जोडलेल्या उद्यानांमुळे धारावी परिसरातील पर्यावरण सुधारेल आणि हरित सार्वजनिक जागा पुनर्विकासाचा महत्त्वाचा भाग ठरतील.



हेही वाचा

बेस्टची दरमहा 1,500 ई-ड्राइव्ह इलेक्ट्रिक मिडी बसेसना मंजुरी

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा