Advertisement

भारत बंद; २५ कोटी कामगार देशव्यापी संपावर


भारत बंद; २५ कोटी कामगार देशव्यापी संपावर
SHARES

देशातील कामगारांनी नागरिकविरोधी धोरणांच्या निषेधार्थ संपाची हाक दिली आहे. देशभरातील तब्बल २५ कोटी कामगार बुधवारी होणाऱ्या देशव्यापी संपात सहभागी होणार आहेत. याबाबत १० केंद्रीय कामगार संघटनांनी दावा केला आहे. आयएनटीयूसी, एआयटीयूसी, एचएमएच, सीआयटीयू, एआययूटीसी, टीयूसीसी, एसईडब्लूए, एआयसीसीटीयू, एलपीएफ, यूटीयूसी यांच्यासह अनेक कामगार संघटना या संपात सहभागी होणार आहेत. कामगारांच्या या संपामुळं देशासह महाराष्ट्रातील विविध सेवांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

'कामगारांच्या मागण्यांना आश्वासन देण्यात कामगार मंत्रालय अपयशी ठरलं. त्यामुळं २ जानेवारी रोजी एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. सरकारच्या धोरणांनुसारच कृती करण्याबद्दल सरकारचा दृष्टिकोन आहे', असं कामगार संघटनांनी (सीटीयू) संयुक्त निवेदनात म्हटलं आहे. फीवाढीची रचना आणि शिक्षणाच्या व्यापारीकरणाविरोधात आवाज उठविण्याच्या उद्देशानं विद्यार्थ्यांच्या सुमारे ६० संघटना आणि काही विद्यापीठांचे निवडून आलेले पदाधिकारीही संपात सहभागी होणार आहेत. १७५हून अधिक शेतकरी आणि कृषी कामगार संघटनांदेखील कामगारांच्या मागण्यांना पाठिंबा देणार असल्याची सांगण्यात आलं आहे.

या धोरणांचा फटका

'कामगारविरोधी धोरणांमुळं १२ विमानतळं खासगीकरणाच्या हेतूनं विकण्यात आली आहेत. एअर इंडियाचीही १०० टक्के विक्री ठरलेली आहे. बीपीसीएल विक्रीचा निर्णय घेण्यात आला आहे. बीएसएनएल-एमटीएनएल विलिनीकरणाची घोषणा झाली आहे. ९३,६०० दूरसंचार कामगारांना व्हीआरएसच्या (ऐच्छिक सेवानिवृत्ती योजना) बाहेर काढण्यात आलं आहे. रेल्वेचं खासगीकरण, ४९ संरक्षण उत्पादनांचे कॉर्पोरेटायझेशन आणि बँकांचं विलीनीकरण करण्याच्या विरोधातही या कामगार संघटना आहेत’, असं कामगार संघटनांनी निवेदनात नमूद केलं आहे.

बँकांच्या कामकाजावर फटका

सरकारी बँक कर्मचाऱ्यांच्या संघटनेनं पुकारलेल्या देशव्यापी संपामुळं बँकांच्या दैनंदिन कामकाजावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. १० कर्मचारी संघटनांनी संपाची हाक दिली आहे. त्यामुळं पैसे भरणं, पैसे काढणं, चेक वटवणं आदी दैनंदिन व्यवहाराला अडचण येऊ शकते. खासगी बँकांचं कामकाज मात्र नेहमीप्रमाणं सुरू असणार आहे.

पालिका कर्मचाऱ्यांचा सहभाग

मुंबई महापालिकेचे १ लाख १० हजार कर्मचारी, अधिकारी सहभागी होणार असल्याचा दावा मुंबई महापालिका कामगार, कर्मचारी संघटना समन्वय समितीनं करण्यात आला आहे. महापालिकेचे सर्व कर्मचारी काळ्या फिती लावून केंद्र सरकारचा निषेध करणार असून, कामगार संघटना दुपारी आझाद मैदानात मोर्चा काढणार आहेत. म्युनिसिपल मजदूर युनियन, म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेना यांच्यासह पालिकेतील ७ कामगार संघटना या संपात सहभागी होणार आहेत.

शाळा, कॉलेजे सुरू

या संपावेळी शाळा बंद राहणार नाही आहेत. परंतु, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी काळ्या फिती लावून काम करणार आहेत. एमफुक्टो आणि बुक्टु या कॉलेज व विद्यापीठ शिक्षक संघटनांनीही संपास पाठिंबा दर्शविला असून, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारीही काळ्या फिती लावून काम करणार आहेत.

वाहतूक सुरूच

मुंबईतील लोकल, बेस्ट, रिक्षा, टॅक्सी, एसटी सेवा सुरळीत सुरू राहणार आहेत. 'मुंबईतील रिक्षा-टॅक्सी नेहमीप्रमाणं सुरूच राहणार आहेत. बेस्ट उपक्रमातील कामगारांसह रिक्षा-टॅक्सी सेवेतील चालक-मालकांनी संपास पाठिंबा दिला असला तरी, सेवांवर परिणाम होणार नाही. एसटी संघटनांनी आंदोलनात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा