समाजकल्याण विभागाच्या वरळी येथील तीन वसतिगृहाची वीज बिल न भरल्यामुळे बुधवारी दुपारी खंडीत करण्यात आली. एेन परीक्षेच्या काळात वीज खंडीत झाल्यामुळे मुलांना अभ्यास करण्यास अडचणी येत आहेत. शिवाय प्रचंड उकाड्यामुळे विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत.
समाज कल्याणच्या भोंगळ कारभारामुळे या वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांवर ही वेळ ओढावली आहे. वीज बिल न भरल्यामुळे मागील दोन महिन्यांतील वीज खंडीत होण्याची ही तिसरी वेळ आहे. बेस्टचे वीज बिलाचे तब्बल 10-12 लाख रूपये थकल्याने वीज खंडीत करण्यात आल्याची माहिती विद्यार्थी देत आहेत.
विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी त्वरीत वीज न उपलब्ध करून दिल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा छात्रभारती विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष सचिन बनसोडे यांनी दिला आहे.