रत्नागिरी जिल्ह्यात २ जुलै रोजी तिवरे धरण फुटल्याची दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेत २३ जणांचा मृत्यू झाला होता. तसंच. तिवरे भेदवाडी गावातील नदी किनारी असलेली घरं नष्ट झाली होती. घराबरोबर जनावरांचे गोठेही वाहून गेले होते. त्यामुळं मोठ्या प्रमाणात गावाचं नुकसानं झालं होतं. त्यामुळं आता या गावाच्या पुर्नवसनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र, तिवरे गावाच्या पुर्नवसन करण्यासाठी प्रभादेवी येथील सिद्धिविनायक न्यास समिती पुढे सरसावली आहे.
तिवरे गावाचं पुर्नवसन सिद्धिविनायक न्यास मंदिर समिती करणार असून, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या सूचनेनुसार न्याय समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. 'शिवसेना आमदार उदय सामंत यांनी सिद्धिविनायक मंदिराला पत्र लिहून तिवरे धरणातील पीडितांच्या पुर्नवसनासाठी मदत करावी अशी मागणी केली होती. तसेच खासदार विनायक राऊत यांनी मंदिर समितीकडे मदत मागितली होती. त्यावर सकारात्मक विचार करुन सिद्धिविनायक न्यास समितीकडून बैठकीत भरीव तरतूद करण्याला मान्यता मिळाली. याबाबतचा पुढील प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडं पाठवला अाहे', अशी माहिती सिद्धिविनायक न्यास समितीचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी दिली.
रत्नागिरीतील तिवरे धरण फुटल्यामुळं तिवरे गावातील सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान झालं. यामध्ये रस्ते, पूल, विद्युतव्यवस्था व इतर मूलभूत सुविधांचा समावेश आहे. तिवरे, फणसवाडी, कुंभारवाडी, भेंदवाडी गावातील नळपाणी पुरवठा योजना धरणफुटीमुळं बाधित झाल्या आहेत. त्यामुळं सदर गावातील पाणीपुरवठा बंद झाला असून, सध्या टँकरनं पाणी पुरवठा केला जात आहे.
हेही वाचा -
नो पार्किंगमध्ये गाडी पार्क केल्यानं महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्यावर कारवाई
कोस्टल रोडवर प्रकल्पाबाबत मुंबई उच्च न्यायालयात अंतिम सुनावणी