ई-गव्हर्नसचा वापर करून महिलांच्या सेवेत तत्परता दाखवणाऱ्या राज्य महिला आयोगाने आणखीन एक दमदार पाऊल टाकलं आहे. पीडित महिलांशी थेट फोनवर संवाद साधणारी नवी 'सुहिता' नावाची मैत्रीण आयोगाने उपलब्ध करून दिली आहे. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने या नव्या 'हेल्पलाईन'सह २ पुस्तकांचं प्रकाशनही यावेळी केल्याचं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी जाहीर केलं
महिलांना एखाद्या प्रसंगी तातडीने मदत आणि समुपदेशन मिळण्याची गरज असते. ग्रामीण भागातील महिला अनेकवेळा एखाद्या प्रसंगात कधी भीतीपोटी, तर कधी अज्ञानापोटी आपल्यावर झालेल्या अन्याची वाच्यता कुठे करत नाहीत. आपल्यावर झालेल्या अत्याचाराबाबत कुणाशी संवाद साधत नाहीत. त्यातून त्यांचं मानसिक खच्चीकरण, तर होतंच शिवाय त्यांच्यावरच्या अन्यायाला वाचाही फुटत नाही.
म्हणूनच राज्य महिला आयोगाने अत्यंत महत्वाचं पाऊल उचललं आहे. ८ मार्च रोजी महिला दिनाचं औचित्य साधून आयोगातर्फे 'सुहिता' नावाची नवी 'हेल्पलाईन' समुपदेशनासाठी उपलब्ध करून देण्यात आली.
सुहिता या हेल्पलाईन विषयी बोलताना विजया रहाटकर यांनी सांगितलं की, या हेल्पलाईनसाठी ७४७७७२२४२४ हा फोन नंबर उपलब्ध करून देण्यात आला आहे. कार्यालयीन कामकाजाच्या वेळात ही हेल्पलाईन सुरू राहणार आहे. ही हेल्पलाईन मराठी आणि हिंदी या दोन भाषांमधून उपलब्ध असल्याने त्याचा फायदा शहरी तसेच ग्रामीण महिलांनाही होणार आहे.
या हेल्पलाईनच्या माध्यमातून समोरच्या महिलेचं म्हणणं ऐकून त्यावर तिचं समुदपदेशन करण्यात येईल. तसंच तक्रारीचं स्वरूप जाणून संबंधित जिल्ह्यातील संबंधित विभागाला या हेल्पलाईन मार्फत ई-मेल करून तातडीने माहिती देण्यात येईल. तक्रारीचं गांभीर्य लक्षात घेऊन आवश्यकता असल्यास आयोगामध्ये सुनावणीसाठीही बोलावण्यात येईल. अशी तीन महत्वाची कामे या हेल्पलाईनच्या माध्यमातून करण्यात येतील.
या हेल्पलाईनवर ज्या महिलेने तक्रार केली आहे तिला तिच्या मोबाईलवर तिकिट नंबर मेसेज केला जाईल. जेणेकरून त्याबाबत पाठपुरावा करणं सोपं होईल. त्यामुळे ही हेल्पलाईन खऱ्या अर्थाने महिलांसाठी एक मैत्रीणच ठरेल, असा विश्वास विजया रहाटकर यांनी केला.
महिला दिनाच्या निमित्ताने ८ मार्च रोजी आयोगाच्या वांद्रे येथील कार्यालयात एका विशेष कार्यक्रमात या हेल्पलाईनचे लोकार्पण करण्यात आलं. याचवेळी “प्रवास सक्षमतेकडे” व “साद दे...साथ घे” या दोन पुस्तकांचं प्रकाशनही करण्यात आलं. कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडलेल्या महिंलाचं समुपदेशन करणाऱ्यांना हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल. तर आयोगाने सोडविलेल्या २५ यशस्वी प्रकारणांचा अंतर्भाव असलेलं साद दे.. साथ घे.. हे पुस्तक आहे.
राज्य महिला आयोगाकडे दररोज प्रत्यक्ष, पत्र आणि ई मेलद्वारे १०० ते १२० तक्रारी येतात. राज्यभरातून महिलांना न्यायासाठी आयोग कार्यालयात यावं लागतं. मात्र या नव्या हेल्पलाईनमुळे ही न्याय प्रक्रिया अधिक सुलभ होईल, असा विश्वास विजय रहाटकर यांनी व्यक्त केला.