मुंबईची लाईफलाईन म्हणजे लोकल. तर दररोज लोकलनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्याही फार मोठी. पण याच मुंबईच्या लाईफलाईनला मोठा ब्रेक लागतो तो पावसाळ्यात. मुंबईत मुसळधार पाऊस झाल्यास लोकल बंद पडतातच, पण गेल्या काही वर्षांपासून हलक्या पावसातही रेल्वे रूळांवर पाणी साचून लोकल सेवा विस्कळीत होताना पाहायला मिळते. याचं कारण म्हणजे रेल्वे रूळांची आणि रूळालगतच्या नाल्यांची साफसफाई. रूळांची आणि नाल्यांची साफसफाई योग्यरित्या होत नसल्यानं रूळांमध्ये आणि नाल्यांमध्ये कचरा साचून राहतो, परिणामी रूळ पाण्याखाली जातात आणि लोकल सेवेला ब्रेक लागतो. आता मात्र पावसाळ्यात लोकलला ब्रेक लागण्याच्या घटनांनाच ब्रेक लागणार असल्याचा दावा पश्चिम रेल्वे प्रशासनानं केला आहे. कारण पश्चिम रेल्वेनं रूळांच्या साफसफाईसाठी आता 'मक स्पेशल लोकल'ची बांधणी केली आहे. खास रूळांच्या साफसफाईकरता 'मक स्पेशल लोकल'ची बांधणी करण्यात आली आहे.
रूळांच्या साफसफाईसाठी पश्चिम रेल्वेनं २५ वर्षे जून्या लोकलचा पुर्नवापर केला आहे. या लोकमधील सर्व आसनं आणि विभाजक काढून लोकल पूर्णपणे मोकळी केली आहे. जेणेकरून कर्मचारी रूळांवरील कचरा काढून रूळांच्या बाजूला लावतील आणि मग हा कचरा या मक स्पेशल लोकलमध्ये भरण्यात येईल. तर कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी एकाच वेळी मोठ्या प्रमाणात कचरा नेणंही आता या लोकलमुळे सोप होणार आहे. तसंच ही लोकल बरीच मोठी असल्यानं त्यात मोठ्या प्रमाणात कचरा गोळा करणंही सोप होणार आहे.
या 'मक स्पेशल लोकल'ची बांधणी महालक्ष्मी रेल्वे कारखान्यात करण्यात आली आहे. तर सध्या ही लोकल मुंबई सेंट्रल स्थानकात आहे. रविवारी, २७ जानेवारीला मुंबई सेंट्रल स्थानकावरील फलाट क्रमांक ५ वर उभ्या असलेल्या या अनोख्या लोकलची पाहणी केली. दरम्यान चर्चगेट-विरार-डहाणू रोड दरम्यानच्या मार्गावरील रूळांवरील करचा जमा करम्याचं काम या लोकलच्या माध्यमातून केलं जाणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी दिली आहे.
हेही वाचा -
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात ६ सेगवे वाहने दाखल
लांब पल्ल्यांच्या गाड्यांमध्ये आता खानपान सेवेसाठी डिजिटल पेमेंटची सुविधा