इंग्लंड आणि वेल्समध्ये ३१ मेपासून सुरू होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेसाठी निवड समितीनं भारतीय संघ सोमवारी जाहीर केला आहे. १५ सदस्यीय संघाचं नेतृत्व विराट कोहली करणार असून, रोहित शर्मा उपकर्णधार असणार आहे. बीसीसीआयचे सचिव अमिताभ चौधरी आणि निवड समिती प्रमुख एमएसके प्रसाद यांनी हा संघ जाहीर केला आहे. इंग्लड आणि वेल्स या देशांमधील एकूण ११ मैदानांवर हे सामने होणार असून, लॉर्डसच्या मैदानावर या वर्ल्ड कपचा अंतिम सामना रंगणार आहे. यामुळं लॉर्डसला पाचव्यांदा विश्वचषकाचा अंतिम सामना घेण्याचा मान मिळणार आहे.
शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी, केदार जाधव, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, लोकेश राहुल, दिनेश कार्तिक, विजय शंकर, रवींद्र जडेजा.
वर्ल्ड कप स्पर्धा इंग्लड आणि वेल्समध्ये ३० मे ते १४ जुलै या कालावधीत होणार आहे. वर्ल्ड कपचा पहिला सामना ३० मे रोजी इंग्लड विरूद्ध दक्षिण अफ्रिका यांच्यात रंगणार आहे. या स्पर्धेत एकूण ४८ सामने होणार असून १९९२ च्या वर्ल्ड कपप्रमाणेच यंदाच्या वर्ल्ड कपचे स्वरूप असणार आहे. त्यानुसार, १० संघात होणाऱ्या या वर्ल्ड कप स्पर्धेत प्रत्येक संघ साखळी फेरीत एकमेकांविरूद्ध लढतील. त्यानंतर यामधील पहिले ४ संघ उपांत्य फेरीत जातील.
वर्ल्ड कपमधील पहिला उपांत्य फेरीचा सामना गुणतालिकेत अव्वल असणाऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर असणाऱ्या संघामध्ये होणार आहे. तसंच, दुसरा उपांत्य सामना गुणतालिकेत दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी असणाऱ्या संघात होणार आहे.
हेही वाचा -
रिंकूच्या ‘कागर’चा ट्रेलर पाहिला का?
उत्तर भारतीय मतदारांसाठी भोजपुरी कलाकार रिंगणात