मालमत्ता चोरीतही महाराष्ट्र पहिला

एनसीआरबीच्या २०१७ च्या आकडेवारीनुसार, राज्यातून दर दिवशी सुमारे चार कोटी १६ लाख रुपयांच्या मालमत्तेची चोरी होते.

मालमत्ता चोरीतही महाराष्ट्र पहिला
SHARES

महाराष्ट्रात दिवसेंदिवस गंभीर गुन्ह्यांचा वाढता आलेख लक्षात घेता, गुन्हा उकलीचे प्रमाण चिंताजनक आहे. मात्र त्यातही, मालमत्ता चोरीच्या गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र अग्रेसर आहे.  देशात चोरी झालेल्या एकूण मालमत्तेत ३० टक्के मालमत्तेची चोरी एकट्या महाराष्ट्रातून झाली आहे. गंभीर बाब म्हणजे त्यातील केवळ १३.७ टक्केच मालमत्ता हस्तगत करण्यात यश आले आहे.

एनसीआरबीच्या २०१७ च्या आकडेवारीनुसार, राज्यातून दर दिवशी सुमारे चार कोटी १६ लाख रुपयांच्या मालमत्तेची चोरी होते. देशाचा विचार केला, तर दररोज पावणे चौदा कोटी रुपयांची मालमत्ता चोरीला जात आहे. देशातून ५००२ कोटींची मालमत्ता २०१७ मध्ये चोरीला गेली आहे. त्यातील एक हजार ५२१ कोटी रुपयांची मालमत्ता महाराष्ट्रातून चोरी झाली असल्याची धक्कादायक माहीती पुढे आली आहे. सर्वात गंभीर बाब म्हणजे संपूर्ण देशात चोरी झालेल्या मालमत्तेचे प्रमाण २५.९ टक्के असताना राज्यातील केवळ १३.७ टक्के मालमत्ता हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. 

संपूर्ण देशाचा विचार केला, तर सात लाख ३९ हजार ९४९ चोरी अथवा दरोड्याचे एकूण गुन्हे दाखल झाले आहेत. त्यात पाच लाख ८९ हजार ५८ चोरी, एक लाख १० हजार ७११ घरफोडी, ३० हजार ७४२ जबरी चोरी, तीन हजार ५७५ दरोड्याचे गुन्हे दाखल झाले आहेत. देशात २०१७ मध्ये झालेल्या चोऱ्यांचा विचार केल्यास, मोटर कार चोरीच्या गुन्ह्यांतून सर्वाधिक म्हणजेच एक हजार २५२ मालमत्ता चोरीला गेली आहे.

एनसीआरबीच्या २०१७ च्या आकडेवारीनुसार, चोरीला गेलेल्या मालमत्तांचा विचार केल्यास २०१५ ते २०१७ मध्ये त्यात प्रचंड घट झाली आहे. २०१५ मध्ये राज्यात ४५३३ कोटींच्या मालमत्तेची चोरी झाली होती. २०१६ मध्ये ३३७१ कोटींची, तर २०१७ मध्ये १५२१ कोटीच्या मालमत्तेची चोरी झाली आहे. पण इतर राज्यांच्या तुलनेत हा आकडा खूपच जास्त आहे. मालमत्ता चोरीबाबत महाराष्ट्रानंतर कर्नाटकाचा क्रमांक लागतो. वर्षभरात तेथे २९५ कोटींच्या मालमत्तेची चोरी झाली होती. महाराष्ट्रातून चोरीला गेलेली मालमत्ता त्याच्या पाच पट जास्त आहे.



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा