मुंबई पोलिसांनी आतापर्यंत अनेक सराईत आरोपींना बेड्या ठोकत त्यांना तुरुंगात डांबलं आहे. मात्र सध्या पोलिस एका आरोपीच्या कस्टडीमुळे चिंताग्रस्त आहेत. याचं कारणही तसंच आहे, या आरोपीवरून पोलिसांची नजर हटली की, तो स्वत:ला जखमी करून घेतो. नुकतंच पोलिस या आरोपीला अटक करण्यासाठी घरी गेले. त्यावेळी या बहादूरने घरातील चाकूनेच पोलिसांची नजर चुकवून स्तव:च्या गळ्यावर ओढत जखमी करून घेतले. जखमी व्यक्तिला पोलिस अटक करू शकत नाहीत त्यामुळे त्यानं हे टोकाचं पाऊल उचलल्याचं तो सांगतो.
मानखुर्दच्या शांतीनगर झोपडपट्टीत राहणारा आरोपी नरेश जैस्वाल (40) हा दादरच्या भाजी मार्केटमध्ये पहाटे भाजी विकतो. त्यानंतर मित्रांसोबत छोट्या-मोठ्या चोऱ्या करतो. नरेशवर यापूर्वीही अनेक गुन्हे केल्याचा आरोप आहे. 9 आक्टोबर रोजी नरेश आणि त्याच्या मित्राने शिवाजी पार्क परिसरात तक्रारदारांना गाठून हातचलाखिने त्यांच्या सोन्याचे दागिने काढून घेत त्याची फसवणूक केली होती. या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी शिवाजी पार्क पोलिसांनी त्या परिसरातील सीसीटीव्ही तपासल्यानंतर नरेशची ओळक पटली.
नरेश हा मानखुर्द परिसरात राहा असल्याचं कळाल्यानंतर पोलिस त्याला अटक करण्यासाठी पोहचले. पोलिस त्याला पकडून नेत असताना अचानक पोलिसांच्या हाताला झटका देऊन ओट्यावर पडलेला चाकू घेऊन स्वत:ला जखमी करून घेतलं. वेळीच पोलिसांनी त्याला रुग्णालयात नेल्याने त्याचे प्राण वाचले.
मात्र अशा प्रकारे पोलिसांकडून अटक टाळण्यासाठी त्याने केलेले हे कृत्य पहिलं नव्हे. यापूर्वीही त्याच्यावर अनेक गुन्ह्यांचे आरोप आहेत. ज्यावेळी पोलिस त्याला पकडायला जायचे. त्यावेळी तो स्वत:ला जखमी करून घ्यायचा. जखमी व्यक्तींना पोलिस अटक करत नसल्याने तो हे कृत्य करायचा. पोलिसांनी त्याच्याजवळून चोरीचा सर्व मुद्देमाल हस्तगत केला असून न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनावली आहे.