नशेत गाडी चालवण्याची झिंग अपघाताला कारणीभूत ठरली आहे. पश्चिम द्रुतगती मार्गावर शनिवारी दारू पिऊन भरधाव वेगाने गाडी चालवल्याने झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.
शनिवारी रात्री पश्चिम द्रुतगती मार्गावर बोरिवलीजवळ हा अपघात घडला. यामध्ये मूळचा सातारा येथे राहणारा अजित आरगडे (२७) हा कारचालक होता. शनिवारी रात्रीच्या सुमारास अजित त्याच्या रवींद्र जांभळे आणि निलेश भातुसे या दोन मित्रांसोबत कारने दक्षिण मुंबईच्या दिशेनं प्रवास करत होता. त्यावेळी अजित हा दारूच्या नशेत असल्याने पश्चिम द्रुतगती महामार्गावरील ठाकूर कॉम्प्लेक्स ब्रिजजवळ त्याचं गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि पुढे असलेल्या दुसऱ्या गाडीला त्याची गाडी आढळली.
या अपघातात अजित, रवींद्र आणि निलेश हे तिघेही गंभीर जखमी झाले. या तिघांनाही उपचारासाठी तातडीनं कांदिवली येथील सेव्हन स्टार रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यावेळी रुग्णालयात जात असताना अजितचा मृत्यू झाला असून रवींद्र आणि निलेश या दोघांवर उपचार सुरू आहेत.