अभिनेता रणवीर सिंग हे नाव आता बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये प्रस्थापित झालं आहे. सामान्य प्रेक्षकांसोबतच बॉलिवुडमध्येही रणवीरचे आणि त्याच्या अभिनयाचे अनेक चाहते आहेत. रणवीरवरचं प्रेम व्यक्त करण्यासाठी म्हणा किंवा त्याचं कौतुक करण्यासाठी म्हणा, रणवीरचे चाहते अनेक मार्गांचा अवलंब करतात. अनेक जण रणवीरला पत्र लिहूनही शुभेच्छा देतात. पण या सगळ्या पत्रांमध्ये रणवीरसाठी एका व्यक्तीचं पत्र सर्वात महत्वाचं असतं. इतकं की या व्यक्तीचे पाठवलेली पत्र रणवीर घरात ठेवण्याची रिस्क घेत नाही. ही पत्र तो चक्क बँकेच्या लॉकरमध्ये ठेवतो!
गेल्या काही महिन्यांपासून अभिनेता रणवीर सिंग आणि त्याची 'पद्मावत' चित्रपटातली भूमिका भलतीच चर्चेत आहे. त्याने साकारलेल्या अलाउद्दीन खिलजीच्या भूमिकेला समिक्षकांसोबतच सिनेरसिकांनीही कौतुकाची थाप दिली आहे. पण या सगळ्यात जास्त रणवीर सिंगला कुणाच्या कौतुकाची अपेक्षा होती, तर ती म्हणजे बीग बी अमिताभ बच्चन! प्रत्येक वेळी रणवीरची भूमिका आवडली की अमिताभ बच्चन त्याचं कौतुक करतात. पण त्यांची रणवीरचं कौतुक करण्याची पद्धत मात्र वेगळी आहे!
बीग बी अमिताभ बच्चन रणवीरचं कौतुक करण्यासाठी त्याला थेट पत्र पाठवतात! पण थांबा. ही पत्र साधीसुधी नसतात. ही पत्र खुद्द बीग बींनी स्वत:च्या हातांनी लिहिलेली असतात! रणवीरची एखादी भूमिका आवडली, की बीग बी त्याचं अशा स्पेशल पद्धतीने कौतुक करतात. स्वत: रणवीरने ट्वीटरवर याबद्दल सांगितलं आहे. आणि आता प्रत्यक्ष बीग बींनी स्वत:च्या हस्ताक्षरात पत्र लिहून पाठवलं, म्हणजे एवढा महत्वाचा दस्तावेज बँकेच्या लॉकरमध्ये नाही ठेवणार तर ठेवणार कुठे?
पद्मावत सिनेमा पाहिल्यानंतर बीग बी अमिताभ बच्चन यांना रणवीरची भूमिका प्रचंड आवडली. इतकी, की त्यांनी एक खास पुष्पगुच्छ आणि स्वत:च्या हस्ताक्षरातलं एक पत्र रणवीरला पाठवलं आहे. या पत्रात अमिताभ बच्चन यांनी रणवीरचं मन भरून कौतुक केलं आहे. महानायकांनी एवढं कौतुक केल्यानंतर रणवीरही भारावून गेला आहे. त्याने आपला हा आनंद ट्वीटरद्वारे चाहत्यांबरोबर शेअर केला आहे.
Mujhe mera award mil gaya 🙏🏽😇@SrBachchan pic.twitter.com/zlo9B6G2od
— Ranveer Singh (@RanveerOfficial) January 29, 2018
रणवीर म्हणतो, मिस्टर बच्चन यांचं पत्र हे माझ्यासाठी 'पद्मावत'साठीचा पहिला पुरस्कारच आहे! त्यांचे हे पत्र आणि त्यांनी पाठवलेली फुलांची भेट माझ्यासाठी काय आहे, हे मी शब्दांत नाही सांगू शकत. प्रत्येक वेळी माझ्या अभिनयाचं कौतुक करण्यासाठी ते स्वत: हाताने लिहिलेलं पत्र पाठवतात. मला जेव्हा हे पत्र मिळतं, तेव्हा मी ते फ्रेम करतो आणि थेट बँक लॉकरमध्ये ठेवतो. ते पत्र मी घरी ठेवू शकत नाही. त्यांची ही भेट माझ्यासाठी अनमोल आहे. माझे सगळे अॅवॉर्ड घरी कपाटात आहेत. पण अमिताभ यांनी लिहिलेली पत्रं मी बँक लॉकरमध्ये ठेवतो!"
यापूर्वीही २०१५ मध्ये अमिताभ यांनी रणवीरला स्वत:च्या अक्षरात लिहिलेले पत्र आणि फुले पाठवली होती. निमित्त होतं 'बाजीराव मस्तानी'चं. या चित्रपटातील रणवीरच्या अभिनयावर अमिताभ प्रचंड खूश होते. म्हणून कौतुक करण्यासाठी अमिताभ बच्चन यांनी रणवीरला पत्र लिहिलं होतं.