Advertisement

'मन बावरे'- प्रेम हे ची नवीन प्रेमकथा


'मन बावरे'- प्रेम हे ची नवीन प्रेमकथा
SHARES

प्रेम हे कसं, कधी आणि कोणावर होईल याची काहीच शाश्वती नसते. काही जणांशी क्षणार्धात मैत्री होते, तर कधी वर्षानुवर्षांची ओळख असली तरी त्या व्यक्ती एकमेकांना तशा अनोळखीच राहतात. अनेकदा आपल्याच भोवतालच्या व्यक्ती आपल्याला आवडतात पण त्यांना मनातलं कधीच सांगता येत नाही . मग एकतर त्या व्यक्ती कुठेतरी दूर निघून जातात नाहीतर आपण कुठेतरी हरवतो. आपण आयुष्यात नेहमी काहीतरी शोधत असतो आणि ते शोधण्याच्या नादात अनेक वेळा आयुष्यातील महत्वाच्या व्यक्तींकडे दुर्लक्ष होते. प्रेमाची या सोमवारी येणारी नवीन गोष्ट आहे मन बावरे. कधी हसणारे कधी रुसणारे अल्लड वळणावर कधी फसणारे ...मन बावरे, ह्या कथेत गार्गी आणि आदित्य आयुष्याच्या एका अशा वळणावर भेटले आहेत, जिथे प्रेमाची व्याख्याच बदललेली आहे. येत्या सोमवारी १० एप्रिल आणि मंगळवार ११ एप्रिलला रात्री ९ वाजता, आपल्याला पल्लवी पाटील आणि सिद्धार्थ मेनन यांचे एक अनोखे प्रेम झी युवावर पाहायला मिळेल. मुंबईतील एका चाळीत राहणाऱ्या गार्गी आणि आदित्यची हि गोष्ट. 

गार्गी एक अतिशय सुंदर छान स्वभावाची मुलगी. जी लहानपणापासूनच चाळीतील सर्वच कार्यक्रमात भाग घेणारी, सर्वांची आवडती तर आदित्य हा तसा शांत पण गुणी मुलगा. लहानपणापासूनच त्याला गार्गी आवडायची. पण त्याला कधीच व्यक्त होता आले नाही. जसे ते दोघे मोठे होत गेले, ते प्रेम अव्यक्तच राहिले. नंतर आदित्य शिक्षणासाठी मुंबईबाहेर गेला आणि जेव्हा परत आला तेव्हा सगळंच बदललेलं. लोकांची गार्गीकडे बघण्याची दृष्टीच चुकीची किंवा वाईट झालेली. एक वाया गेलेली मुलगी म्हणून तिला लोक ओळखायला लागलेले.. आदित्यला काहीच समजतं नव्हतं. पण हे नक्की का घडलं आणि कशामुळे घडलं हे न समजल्यामुळे शेवटी आदित्यने गार्गीलाच विचारले. पण गार्गीने सुद्धा त्याला काहीच कळू दिले नाही. अशी ही दोघांची एका वेगळ्याच वळणावरील लव्हस्टोरी पूर्ण होते का? की अर्धवटच राहते, नक्की असं गार्गीच्या आयुष्यात काय घडलेलं असतं ज्यामुळे सर्वांची आवडती गार्गी लोकांच्या वेगळ्या नजरेची शिकार बनते. ह्या सर्व प्रश्नाची उत्तर समजून घ्यायची असतील तर प्रेम हे ची प्रेम कथा पहावी लागेल.



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा