महाराष्ट्रात गेल्या ४ वर्षांत दोन लाखांहून अधिक झाडे बेकायदेशीरपणे तोडण्यात आली आहेत. राज्याच्या विविध भागांत या संदर्भात ४८ हजारांहून अधिक तक्रारी दाखल झाल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी विधान परिषदेत दिली.
शिवसेना आमदार मनीषा कायंदे यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला मुख्यमंत्री उत्तर देत होते.
ठाकरे यांनी त्यांच्या लेखी उत्तरात सांगितलं की, "गेल्या चार वर्षांत तब्बल २,८४,१७१ झाडे बेकायदेशीरपणे तोडण्यात आली. त्याची किंमत २१.९५ कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे."
ते पुढे म्हणाले की, "या कालावधीत किमान ४८,८९३ फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यापैकी १,४३५ गंभीर गुन्हे म्हणून नोंदवले गेले आहेत. उर्वरित प्रकरणं सौम्य गुन्हे म्हणून वर्गीकृत करण्यात आली आहेत. "
मंत्रिमंडळातील सहकारी संजय राठोड यांनी मार्च २०२१ मध्ये पदाचा राजीनामा दिल्यानंतर ठाकरे यांच्याकडे वनखात्याची जबाबदारी आहे.
कायंदे यांच्या दुसर्या तारांकित प्रश्नाच्या लेखी उत्तरात ठाकरे म्हणाले, "मुंबई उपनगरी जिल्ह्यानं २०१९ ते २०२१ दरम्यान खारफुटीचे १.०८ चौरस किमी क्षेत्र गमावले आहे. नुकत्याच प्रकाशित झालेल्या इंडिया स्टेट फॉरेस्ट रिपोर्ट २०२१ मध्ये ही आकडेवारी नोंदवली गेली आहे."
राज्य खारफुटी कक्षानंही तब्बल ८००० बेकायदा बांधकामे जमीनदोस्त केली आहेत, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
हेही वाचा