मुंबईतील (mumbai) रेल्वेजाळे वाढवण्यासाठी नव्या रेल्वे मार्गिका उभारण्याचे नियोजन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग असलेल्या बोरिवली (borivali) ते विरार (virar) पाचवी-सहावी मार्गिका आणि कल्याण ते कसारादरम्यान तिसऱ्या मार्गिकेसाठी 29.32 हेक्टर वनजमिनींवरील झाडे (tree cutting) तोडण्यास मंजुरी मिळाली आहे.
यामुळे लवकरच या मार्गिका रुळांवर येणार असून त्यांच्या प्रत्यक्ष उभारणीस सुरुवात होणार आहे. मध्य रेल्वेवरील कल्याण ते कसारा तिसऱ्या मार्गिकेच्या उभारणीसाठी ठाणे जिल्ह्यातील 17 गावांमधील 16.54 हेक्टर जमिनीवरील झाडे, संरक्षित वने, पुनर्स्थापित खासगी वने, अंतिम संपादित वने यांच्यावर कुऱ्हाड पडणार आहे.
ठाण्यातील मुख्य वन संरक्षकांनी सशर्त काम सुरू करण्याची परवानगी दिली आहे. 5 डिसेंबर 2025 पर्यंत ही परवानगी वैध असेल. वनक्षेत्रात काम करताना नैसर्गिक जलस्रोतांचे प्रवाह बंद होणार नाहीत, याची दक्षता घेण्याची सूचना वन विभागाने मध्य रेल्वेला केली आहे.
मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या (MRVC) एमयूटीपी-3 अ प्रकल्प संचाअंतर्गत बोरिवली-विरार पाचवी आणि सहावी मार्गिका प्रकल्प पूर्ण करण्यात येत आहे. 26 किमीच्या या नव्या रेल्वे मार्गिकांसाठी 2,184.02 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
प्रकल्पपूर्तीनंतर बोरिवली ते विरारदरम्यान उपनगरीय रेल्वे आणि लांब पल्ल्यांच्या रेल्वेगाड्या यासाठी स्वतंत्र मार्गिका उपलब्ध होणार आहेत. या मार्गिकांसाठी 12.78 हेक्टर वनजमिनीवरील कांदळ वने तोडण्यात येणार आहेत.
मुंबई उपनगरासह ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील रेल्वेजमिनींचा यात समावेश आहे. उपनगरातील दहिसर गावातील 3.68 हेक्टर, ठाण्यातील पेणकर पाडा परिसरातील 1.42 हेक्टर आणि पालघरमधील उमेळे गावातील 7.66 हेक्टर कांदळवनांवर घाव घालून ही जमीन सपाट करण्यात येणार आहे.
‘केंद्र सरकारसह राज्य सरकारी पर्यावरण विभागाने सार्वजनिक हिताच्या प्रकल्पासाठी झाडे तोडण्याकरता अंतिम मंजुरी दिली आहे. यामुळे येत्या काही दिवसांत कांदळवने (mangroves) हटवून त्या ठिकाणी रेल्वे मार्गिका उभारणीचे कामे सुरू करण्यात येणार आहे,’ असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.
हेही वाचा