राज्यात मागील दोन दिवसांपासून कोरोना रुग्ण बरे होणाऱ्यांची संख्या वाढली आहे. वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर हा मोठा दिलासा मानला जात आहे. मंगळवारी राज्यात ९९२७ नवीन कोरोना रुग्ण आढळले. तर १२,१८२ रूग्ण बरे होऊन घरी परतले. राज्यात आजपर्यंत एकूण २० लाख ८९ हजार २९४ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.३४ टक्के झालं आहे.
राज्यात मंगळवारी ५६ रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यूदर सध्या २.३५ टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत कोरोनाच्या १ कोटी ७० लाख २२ हजार ३१५ चाचण्या झाल्या आहेत. यामध्ये २२ लाख ३८ हजार ३९८ (१३.१५ टक्के ) चाचण्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यातील होम क्वारंटाइन व्यक्तींची संख्या वाढत चालली असून हा आकडा ४ लाख ५७ हजार ९६२ वर गेला आहे. तर ३ हजार ८२७ व्यक्ती सध्या संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ९५ हजार ३२२ आहे. सर्वाधिक १८ हजार १३७ अॅक्टिव्ह रुग्ण पुणे जिल्ह्यात आहेत. त्यानंतर नागपूर जिल्ह्यात ११ हजार ८११ रुग्णावर उपचार सुरू असून ठाणे जिल्ह्यात १० हजार ३३७ तर मुंबईत ९ हजार ३३० अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.