मुंबईतील वाढत कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर महापालिकेनं कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी कंबर कसली आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी महापालिकेने कोरोनाबाधितांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्याची जोरदार मोहीम हाती घेतली असून गेल्या अवघ्या ५ दिवसांमध्ये करोनाबाधितांच्या संपर्कातील ६७ हजार ९६५ व्यक्तींचा शोध घेतल्याची माहिती समोर येत आहे. यापैकी ११ हजार ६६८ संशयित रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षण आढळली असून, या सर्वाची कोरोना काळजी केंद्रामध्ये रवानगी करण्यात आली आहे.
कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या ३० व्यक्तींचा शोध घेण्याचे आदेश पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिले असून, त्यानुसार शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे. मागील ५ दिवसांमध्ये कोरोनाबाधितांच्या संपर्कातील ६७ हजार ९६५ व्यक्तींचा शोध घेण्यात पालिकेला यश आले आहे.
यापैकी ११ हजार ६६८ जणांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आली आहेत. त्यामुळे त्यांना कोरोना काळजी केंद्रात पाठविण्यात आले आहेत. कमी जोखमीच्या गटातील व्यक्तींना गृहविलगीकरणात ठेवण्यात आल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.
मुंबईतील रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता वारंवार वर्तविण्यात येत आहे. ही बाब लक्षात घेऊन आता पालिकेने कोरोनाविषयक चाचण्यांचे प्रमाण वाढविले आहे. त्याचबरोबर कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील अधिकाधिक व्यक्तींचा शोध सुरू केला आहे.